रविवार, १९ सप्टेंबर, २०२१

कौटुंबिक माहिती

 


कौटुंबिक माहिती 

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

1. पंढरीनाथ- वडील, 2. दत्तात्रेय- आजोबा 

3. बळवंत- पणजोबा

1. ज्योत्स्ना- आई

 2. आनंदी- आजी

आईची आई - लक्ष्मी

गोत्र- सांख्यायन

नूतन 

बाबा- वसंत 

आजोबा- लक्ष्मण

पणजोबा- दत्तात्रेय

आई- पद्मा

आजी( वडिलांची आई)- वारूबाई

आजी (आईची आई)- लक्ष्मी

रविवार, ५ सप्टेंबर, २०२१

आईसाठी पान

आईसाठी पान 

आई 
स्व. ज्योत्स्ना पंढरीनाथ जुन्नरकर (माहेरचे नाव- सुमती शंकर राजे)
                                                (२६/५/१९२८-१७/१२/२००८)

जन्म आणि बालपण:

आई सातव्या महिन्यात जन्मली.सहावा पूर्ण होऊन एकच दिवस झाला आणि आईचा जन्म झाला. त्यावेळेस सहाव्या महिन्यात जन्मलेली मुलं जगत नसत. आईच्या आधी आजीला जुळे मुलगे झाले पण अपुऱ्या दिवसांचे झाले आणि गेले. त्यानंतर एक मुलगा झाला तोही तसाच अपुऱ्या दिवसांचा होता आणि गेला. मग आई झाली. आई खूप नाजूक होती. आमच्या आजीने (आईच्या आईने) आईची वर्षभर  जिवापाड काळजी घेतली. तिला अंगाला तेल  मालिश करून कापसात आणि सुती नऊवारी साडीत ऊब मिळावी म्हणून गुंडाळून ठेवी. तिने बाळसं धरेपर्यंत साधारण सात ते आठ महिने तिला अंघोळ घालत नसे. आईला भरभर चालता येत नसे. आजोबा तिला स्वयंपाकाव्यतिरिक्त कष्टाची कामं - भांडी घासणे, विहीरीचं पाणी काढणे, पाणी भरणे, कपडे  धुणे  वगैरे  करू  देत नसत.

आईकडे  पणजीच्या खूप आठवणी होत्या.  कुसुममावशी किंवा शालीमावशी झाली तेव्हा बहुतेक पणजी वारली. 

आईला घरकामाची खूप आवड होती. आजोबांच्या शर्ट, पॅन्ट, कोटाची निघालेली बटणं आई लावत असे, उसवलेले आजोबांचे कपडे आई रिपेअर करून देई. स्वैपाक नासधूस न करता निगुतीने आणि चविष्ट बनवी त्यामुळे आजोबा म्हणत, "ताई,  संसार छान करील".  आईला टापटीप आणि स्वच्छतेची आवड होती. बाकी सारी भावंडे  वेळ वाया  घालवीत  तेव्हा आई  ही  कामं करून नवीन गोष्टी  शिकायची. ती झाशीला स्वेटर विणायला खराट्याच्या काड्यांवर शिकली होती. क्रोशिया वर्क, भरतकाम पण ती असंच शिकली होती. घरातही ती कोणाच्या अध्यात-मध्यात नसायची.

आई सांगे, आजोबांचं इंग्लिश चांगल होतं. आजीच्या हातचं जेवायला आजोबांचे साहेब त्याच्या बायकोला घेऊन येत असे (बहुतेक नागपूर). आजी साहेबाच्या बायकोला संक्रांत आणि चैत्रगौरीच्या हळदकुंकवाला बोलवत असे. आजोबा त्याचं महत्त्व त्या लोकांना इंग्लिश मध्ये सांगत. आईचं शिवणकाम, विणकाम अतिशय छान होत. ती बदलीच्या ठिकाणी वेगवेगळ्या शेजार्यांकडून शिकली होती. मुंबईत आल्यावर तिने दादरला झारापकरचा शिवण क्लास लावून पूर्ण डिप्लोमा चांगल्या मार्कांनी पास केला होता.

शिक्षण:


आई  आठवीपर्यंत शिकली होती.  घरी आजीची (आईच्या आईची) बाळंतपणं असत. आई घरातली मोठी मुलगी त्यामुळे तिची आजी (आजोबांची आई) सतत आईला हाताशी घ्यायची,  आपल्या आजीच्या (आईची आई) बाळंतपणात. आपल्या आजीची अकरा बाळंतपण झाली. आईची आजी गेल्यावर आईच तिच्या आईचा घरकामात आधार झाली. वर्षाची वाळवणं मसाले आणि स्वैपाक. त्यामुळेच तिचं शिक्षणावरून लक्ष कमी झाले. त्यात आजोबांच्या बदल्या. आजी खूप नातेवाईक सांभाळत असे, तिच त्यांच्याकडे जाणंयेणं असे. (मुली अधिक असल्याने लग्नास स्थळं मिळवण्यात अडचण येऊ नये हा आजीचा उद्देश असे.) आई अशावेळेस आजोबांना आणि बाकी भावंडांना वेळेत स्वैपाक करून जेऊ घाली. 

ज्यांना कुसुमावती देशपांडेंनी शिकवलं ते सर आईला मराठी शिकवायला होते, अस आई कौतुकाने सांगत असे.  आईचा गळा गोड आणि पाठांतर चांगलं असल्याने ते तिला वर्गात कविता म्हणायला सांगत पण लाजेस्तव ती म्हणत नसे. आईचं अंकगणित चांगल होतं, मराठी चांगलं होतं. आईला इतिहास फार आवडत नसे, त्यावेळेस ब्रिटिश इतिहास असे आणि भूगोल तिचा  नावडता  विषय होता. 

आईने नववीची परीक्षा देऊ शकली नाही . कारण त्याच वेळेस आजोबांची बदली झाली. पुढे मुंबईत आल्यावर  दीदीमावशीने अकरावीचा फाॅर्म भरला पण आईचा शाळा सोडल्याचा दाखला नसल्याने ती  फॉर्म  भरू शकली नाही. आईला रेशनिंग ऑफिसात क्लर्कची नोकरीमावशी मिळत होती पण आजोबांनी नोकरी करायला नकार दिला.


कवितांची आवड:

शालेय जीवनाबद्दल, शाळेतील शिक्षकांबद्दल आई खूप सांगत असे. आजोबा रेल्वेमध्ये नोकरी करत. त्यांची सतत बदली होत असे. बहुतेक लोक आपलं कुटुंब एका ठिकाणी स्थिर ठेवून बदलीच्या ठिकाणी एकटे जातात. परंतु आजोबा प्रत्येक ठिकाणी आपलं कुटुंब घेऊन जात. त्यामुळे आई सांगते की त्यांच्या शिक्षणाचे फार हाल झाले.

आईकडे प्रत्येक प्रसंगासाठी गाणं किंवा कविता लगेच तयार असे. कुणी आजारी पडलं की,

'पडु आजारी 

मौज हीच वाटे भारी'

आठवणीतल्या कविता संग्रहावरून कळते की ही कवितेचे कवी भानुदास हे आहेत. ही कविता खाली दिली आहे:

पडु आजारी

मौज हीच वाटे भारी


नकोच जाणे मग शाळेला

काम कुणी सांगेल न मजला

मऊ मऊ गादी निजावयाला

चैनच सारी... मौज हीच वाटे भारी


मिळेल सांजा, साबुदाणा,

खडिसाखर, मनुका, बेदाणा,

संत्री, साखर लिंबू आता

जा बाजारी... मौज हीच वाटे भारी


भवती भावंडांचा मेळा

दंगा थोडा जरि कुणि केला

मी कावुनि सांगेन तयाला

जा बाहेरी... मौज हीच वाटे भारी


कामे करतील सारे माझी

झटतिल ठेवायचा मज राजी

बसेल गोष्टी सांगत आजी

मज शेजारी... मौज हीच वाटे भारी

असले आजारीपण गोड

असूनि कण्हती का जन मूढ

म्हणून विचारी... मौज हीच वाटे भारी

शाळेत जावयास निघाले की,

'शाळेत रोज जाताना

मज विघ्ने येती नाना'

कधी कधी तर आम्ही वैतागून म्हणत असू, 'आईचं झालं गाणं सुरू.' 

यांतील बहुतेक कविता 'आठवणीतल्या कविता' या चार भागांच्या संग्रहात आहेत.


गणपती येणार असले की आईचं गाणं असे:

'बाबांच्या खांद्यावरुनी होउन आला स्वार'

आम्ही गणपती बसवला नाही. 'अण्णा म्हणत असत,'गणपतीचं सोवळं-ओवळं खूप कडक असतं. आपण असे घाणीत राहतो. त्यामुळे नकोच ते.' आई घरातलाच देवातील पितळेचा गणपती ताम्हनात ठेवून त्याची पूजा करीत असे व त्याला दूर्वा वाहत असे.

दिवाळी आली की आईचं गाणं असे. बहीण म्हणते-

'आली दिवाळी उद्या सकाळी

दादा तुला मी ओवाळणार

भाऊ तुला मी ओवाळणार'

भाऊबीजेला भाऊ गाणं म्हणतो,

'भाऊबीज बघ उद्या सकाळी 

तेल लावू मज न्हाऊ घाली

ताई छम छम छम '

१९४४ साली मुंबईच्या गोदीत मोठा स्फोट झाला होता. त्यावर आई गाणं म्हणत असे,

'एके दिवशी सायंकाळी महास्फोट झाला

हादरली मुंबापुरी सारी दुसऱ्या स्फोटाला'

आई आणखी एक कविता म्हणत असे. आठवणीतल्या कविता संग्रहावरून मला कळलं की ती कविता कवी गिरीश यांची होती. कवितेमध्ये एक लहान मुलगा आजारी असतो. त्यांचे आईवडील दूर गावी असतात. डॉक्टर त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करीत असतात. पण या प्रयत्नांना यश येत नाही. अखेर मुलगा सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करून सर्वांचा निरोप घेतो. आई ही कविता म्हणायला लागली की मी सांगत असे,'आई, ही कविता म्हणू नकोस.'

आईवरून 'प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधु आई' ही एक कविता आई म्हणत असे. ही कविता माधव ज्युलियन यांची आहे.

याशिवाय,

'शिकणे शिकणे किती आयुष्याची माती'

'पाच पानी विडा, लवंग वेलदोडा

झाली धोतराची उपरणी'

'बेइमान झालो पुरा पुरा

मी देशाचा अपराधि खरा'

'डावा डोळा लावतो माझा

भाऊ माझे स्मरण करी'

ही गाणी आई गुणगुणत असे.

'बेलाग दुर्ग जंजिरा वसईचा किल्लेवाला' ही एक कविता आई म्हणत असे. ही कविता कै. दु.आ.तिवारी यांची असून खालीलप्रमाणे आहे-

बेलाग दुर्ग जंजिरा वसईचा किल्ला असला
दुश्मन फिरंगी तिथला आटोपेना कोणाला
त्या सिंहाला पकडाया भारतीय चिमणा सजला
गोव्याचा टोपीवाला कोंकणचा पगडीवाला
लागली झुंज उभयाला बुद्धीचा डाव उडाला
मोहरा इरेला पडला ||१||

बोलावूनी सरदारांना तो समरधुरंधर बोले
शूरांनो वेढा द्याया चारमास होऊनी गेले
बेहीम्मत जे असतील परतोनी ते जातील
जा कळवा की दादाला 
मोहरा इरेला पडला ||२||

तोफेच्या तोंडी माथे बांधोनी उडवा हाथे
शीर तुटुनी त्या आघाते किल्ल्यात पडूद्या त्याते
ती निर्वाणीची वाणी डोळ्यास आणि पाणी
प्रत्येक वदे गहीवरुनी इर्षेस वीर हा चढला
मोहरा इरेला पडला ||३||

गोळ्यांच्या मार्याखाली चर खोदोनी रेतीत
उडविले सुरंगी बार तट लोळविला मातीत
गर्जना एकदम झाली पडलेल्या खिंडारात
जो बांध तटाचा फुटला तो सेनासागर सुटला
धैर्याचा किल्लेवाला बंदुकीस भाला भिडला
मोहरा इरेला पडला ||४||

मर्दच्या मराठी फौजा रणकीर्ती जणांच्या गाव्या
जणू घोंगावत मधमाश्या मोहोळाला बिलगाव्या
कडकडात वरुनी व्हावा सारखा अग्निवर्षावा
परी तो सिंहाचा छावा परतेना हिम्मतवाला
मोहरा इरेला पडला ||५||

वारावर करतची वार अनुसरले शूर पवार
शिंद्यांचा खांदा घोडा चालला जणू की तीर
बावटा धरुनी तोंडात भोसले चढे जोमात
आगीच्या वर्षावात सामना भयंकर झाला
मोहरा इरेला पडला ||६||

गरनाळी तोफा मोठ्या धुंकार कराया सजल्या
घायाळ धडाधड खाली तनु कितक्यांच्या धड्पडल्या
धातीचे निधडे वीर चिंध्यापरी त्यांच्या झाल्या
पगडीची फौज हटेना क्षत्रुची पकड सुटेना
तो विजयश्रीचा चिमणा बेहोष होऊनी लढला
शौर्याची शर्थ जहाली बावटा तटावर चढला
जयनादाने वसईचा दिग्प्रांत पहा दुमदुमला
तो समय आणि ती मूर्ती ठाके कवीनयनापुढती
मोहरा इरेला पडला ||७||

आणखी एक गोष्ट म्हणजे, आई सांगते की त्या वेळेला त्यांना प्रश्नांची उत्तरे श्लोकांचा स्वरूपात असत. एक उदाहरण मला आठवतं. 

१. बंगालच्या फाळणीची कारणे सांगा.
त्यावर श्लोकात उत्तर असे:
बंगालची फाळणी कर्झनाने
केली पहा खालिल कारणाने'
म्हणजे श्लोक पाठ केला की प्रश्नाचं उत्तर आलं. किती छान कल्पना आहे. 

आणखी एक मला असं जाणवतं की आजकाल लोक येता जाता मेकॉलेचा उद्धार करीत असतात. पण ही पाठ्यपुस्तके आजच्या पाठ्यपुस्तकांपेक्षाही उजवी वाटतात. 

माझ्या मावश्या, मामा, वडील याच अभ्यासक्रमात शिकले होते. पण त्यांच्याकडे असा ठेवा नव्हता. आम्ही मोठे झालो, अभ्यासाला लागलो, मग आईबरोबर संभाषण कमी झाले. आईचा  ठेवा किती अनमोल होता, ते आता कळते.

आवडीची गाणी:

मी एकदा आमच्या ऑफीसच्या मित्रांबरोबर पिकनिकला गेलो होतो. साहजिक गाणी म्हणण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मी काही मराठी गाणी म्हटली आणि सारे थक्क झाले. एकजण म्हणाला, 'साहेब, काय स्टॉक आहे हो तुमच्याकडे. ही कुठली गाणी? ' मी सांगितलं ,' ही गाणी माझी आई म्हणत असे.'

माझ्या आईचा आवाज चांगला होता. ती सतत गाणी गुणगुणत असे. मला आठवणारी गाणी खाली दिली आहेत. ही सर्व गाणी आठवणं शक्य नाही. जेवढी आठवतील तेवढी इथे देतो. पूर्ण गाणं दिल्याशिवाय त्याचे सौंदर्य कळणार नाही, म्हणून पूर्ण गाणी दिली आहेत.

मालती पांडे:

कुणीही पाय नका वाजवू

कुणीही पाय नका वाजवू,  
पाय नका वाजवू  
चाहुल देऊन नका कुणी ग चिमण्याला जागवू

नकोस चंद्रा येऊ पुढती, 
थांब जरासा क्षितिजावरती
चमचमणारे ते चंदेरी चाळ नको नादवू, 

पुष्करिणीतून गडे हळुहळु, 
जललहरी तू नको झुळुझुळु
नकोस वाऱ्या फुलवेलींना फुंकरिने  डोलवू

नकोस  मैने तोल सावरू,
नकोस कपिले अशी हंबरू 
यक्षपऱ्यांनो स्वप्नी नाचुन नीज नका चाळवू

जगावेगळा छंद ग याचा, 
पाळण्यातही खेळायाचा 
राजी नसता अखेर थकुनी पंख मिटे सावरू    

वळणावरुनी वळली गाडी

वळणावरुनी वळली गाडी आज सोडलं गाव 
तुझ्याच आई अश्रूसंगे पुसले पहिले नांव 
नवनावाचं लेवुनी कुंकू जाते माझ्या घरा 
वेडी माया झरते नयनीं भिजवित सारी धरा 
"सांभाळुन जा, सुखी रहा तू जातीस भरल्या घरा" 
बोलांतुन या भिजल्या आला धीर तुझ्या पांखरा 
पाखर आई तव मायेची उदंड लाभो मला 
जायाच्या ग अशाच लेकी तोडूनि ममता-लळा 
तूंच पाहुनी ठेव सुखाची दिलीस माझ्या करीं
तेज मुखावर बघशिल येता, भेटायाला घरी   

कशी रे तुला भेटू मला वाटे लाज

कशी रे तुला भेटू मला वाटे लाज
लौकिक तुझा मोठा आणिक घरंदाज 
करिती कुटाळकी तुझे ते टाळकरी
साथीला साथ देई घरची एकतारी
भोवती निंदकांचे वाजती पखवाज
ओळखते राया माझी मी पायरी
बोलतील तुझी सोयरी धायरी
जहरी बोलाचे हे जुळले तिरंदाज
होईल तेलवात स्नेहात आपोआप
जळेल जन्मोजन्मी प्रीतीचा नंदादीप
वयात यौवनाचा विखुरला साज   

लता मंगेशकर:

डोळे पाण्याने भरले 
तुझे डोळे पाण्याने भरले 
माझे डोळे पाण्याने भरले 

काळजातल्या रेशीमगाठी 
तोडित असता  दोघे मिळुनी 
गळ्यास मारुन आपुल्या मिठी 
प्रीत विचारी कळवळूनी 
'कसे कुणाचे सांगा चुकले 
सांगा चुकले'

अबोल आम्ही दोघे बघुनी 
प्रीत म्हणाली,'जात्ये सोडुनी 
अबोल आम्ही दोघे बघुनी 
प्रीत म्हणाली,'जात्ये सोडुनी 
तिला वंदण्या कर हे जुळले 
कर हे जुळले'

मने भंगली एक होऊनी 
धावु लागली तिच्या मागुनी
नकोस जाऊ म्हणता थबकुनी
गहिवरुनी ती म्हणता चुंबुनी
'झाले गेले, विसरा सगळे 
विसरा सगळे'

गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का ?

गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का ?
जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा

कडकडुनी तू मिठी मारता बाळे
बालपण आले आले घुमवित घुंगुरवाळे
आठवले सारे सारे गहिवरले डोळे 
कढ मायेचे तुला सांगती जा

दारात उभी राहिली खिलारी जोडी
बघ दीर धाकले बसले खोळंबुन गाडी
पूस ग डोळे या पदराने सावर ही साडी
रूपदर्पणी मला ठेवुनी जा

मोठ्यांची तू सून पाटलिण मानाची
हसले तुझे ग बिलवर लगीनचुडे
बघु नकोस मागे मागे लाडके बघ पुढे
नकोस विसरू परि आईला जा


घरात हसरे तारे असता 

घरात हसरे तारे असता 
मी पाहु कशाला नभाकडे

छकुल्यांची ग प्रशांत वदने
गोड गुलाबी गाली हसणे
अमृत त्यांच्या ओठी असता 
कशास मधुघट हवा गडे

गोजिरवाणी जशी वासरे
प्रेमळ माझी गुणी लेकरे
स्वर्ग अवतरे घरात माझ्या 
आनंदाचे पडती सडे

गोकुळ येथे गोविंदाचे 
झरे वाहती शांति सुखाचे
वैभव पाहून मम सदनीचे 
ढगाआड ग चंद्र दडे 

कल्पवृक्ष कन्येसाठी
कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला
वैभवाने बहरून आला याल का हो बघायाला ||ध्रु.||

तुम्ही गेला आणिक तुमच्या देवपण नावा आले
सप्तस्वर्ग चालत येता थोरपण तुमचे कळले
गंगेकाठी घर हे अपुले तीर्थक्षेत्र काशी झाले 
तुम्हावीण शोभा नाही वैभवाच्या देऊळाला || १ ||

सूर्य-चंद्र तुमचे डोळे दुरुनीच ते बघतात
कमी नाही आता काही, कृपादृष्टीची बरसात
पाच बोटे अमृताची पंचप्राण तुमचे त्यात
पाठीवरी फिरवा हात या हो बाबा एकच वेळा || २ ||

आशा भोसले 

पंढरीनाथा झडकरी आता 

 (या गाण्याची आई एक गंमत सांगत असे. अण्णांचं नाव 'पंढरीनाथ ' होतं. आईचं लग्न ठरलं तेव्हा कुणीतरी (मला नाव आठवत नाही ) आईला म्हणाले होते की ,' तुम्ही एक सारखे हे गाणे म्हणत असायचा, म्हणून तुम्हाला पंढरीनाथ मिळाले )

पंढरीनाथा झडकरी आता, पंढरी सोडून चला विनविते रखुमाई विठ्ठला  || ध्रु.||

ज्ञानदेवे रचिला पाया, कळस झळके वरी तुकयाचा

याच मंदिरी आलो आपण प्रपंच करण्या भक्तजनांचा 

भक्त थोर ते गेले निघुनी, गेला महिमा तव नामाचा
विक्रय चाले देवपणाचा, रहायचे मग इथे कशाला || १ ||

धरणे धरुनी भेटीसाठी पायरीला हरिजन मेळा
भाविक भोंदू पूजक म्हणती केवळ अमुचा देव उरला 

कलंक अपुल्या महानतेला बघवेना हो रखुमाईला
यायचे तर लवकर बोला, ना तर द्या हो निरोप मजला || २ ||

शपथ तुला प्रेमा

शपथ तुला प्रेमा

नको त्या मंदिरात जाऊ  || ध्रु.||

यौवन मंदिर नाम तयाचे

मायावी हे कसब मयाचे

लोभस कपटी शोभा इथली

चुकुन नको पाहू  ||१||

दिसते तैसे येथे नाही 

आसन दिसते तेथे खाई

अपघाती या सोपानावर

पाय नको ठेवू || २ ||

या,  या म्हणती जरी युवराजे

हसूच करतील तुझे न् माझे

बाळपणाच्या झोपडीत ये

जन्मभरी राहू || २ ||

सुमन कल्याणपूर 

लिंबलोण उतरू कशी

लिंबलोण उतरू कशी असशी दूर लांब तू

इथून दृष्ट काढिते, निमिष एक थांब तू || ध्रु.||

एकटाच मजसी तू उभ्या जगात लाडका

तूच दुख:सागरी उभविलीस द्वारका

सर्वभार घेतला समर्थ असा खांब तू || १ ||

धन्य कूस आईची धन्य कान-लोचने

कृतार्थ जन्म जाहला फिटून जाय पारणे

अनंत कष्ट सोसले फेडिलेस पांग तू || २ ||

शीणभाग संपला तृप्त माय जीवनी 

आयु उर्वरित ते सुरेल ईश चिंतनी

लाभले न जे कुणा असे सुदैव भोग तू || ३ ||

गजानन वाटवे 


फांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोले

फांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोले
पंचमीचा सण आला, डोळे माझे ओले
श्रावणाच्या शिरव्यांनी आनंदली धराराणी
माझे पण प्राणनाथ घरी नाही आले
जळ भरे पानोपानी संतोषली वनराणी
खळाखळा वाहतात धुंद नदीनाले
पागोळ्या गळतात, बुडबुडे पळतात
भिजलेल्या चिमणीचे पंख धन्य झाले
आरशात माझी मला पाहू बाई किती वेळा
वळचणीची पाल काही भलेबुरे बोले

बाबुराव गोखले 

का नाही हसला नुसते, मी नाही म्हटले नसते

का नाही हसला नुसते, मी नाही म्हटले नसते 
जडलेहि कदाचित असते आपुलेच अवचित नाते || ध्रु.||
सज्जात उभी मी होते, रस्त्यात पाहिले तूते
डोळ्यांनी सांगत होते, का नाही ओळखले ते
मश्गूल तुझे मन होते कीर्तीला जिंकायाते
परि तुजला जिंकायाते अंतरी झुरत मी होते || १ ||
मी होउन पुसले असते, तू नाही म्हटले असते
त्या पराभवाचे पाते काळजात घुसले असते
तू वरिले दुसऱ्या स्त्रीते, मज दिले दुज्या पुरुषाते
दु:खात सुख परि इतुके, हे कुणास कळले नव्हते || २ ||

 बबनराव नावडीकर 

कुणी आलं कुणी आलं, जीवाला वेड लावून गेलं 
कुणी आलं कुणी आलं, जीवाला वेड लावून गेलं 

नाही ठाऊक नांव नाही माहीत गाव
मला पाहून उगीच हंसलं, उगीच हसलं, उगीच हसलं

होते आंबेवनात गीत मजेत गात 
तोच पाल्यांत पाऊल वाजलं, पाऊल वाजलं, पाऊल वाजलं

गोड सकाळचा पार वारं झुळुझुळु गार
फूल उंबराचं अवचित फुललं, अवचित फुललं, अवचित फुललं

गाणं राहिलं गळ्यांत दृष्टी फिरली मळ्यांत 
टोंक फेट्याचं पिकात लपलं, पिकात लपलं, पिकात लपलं

त्याच्या नजरेची धार भेदी जीवास पार 
त्यानं चोरून काळीज नेलं, काळीज नेलं, काळीज नेलं 

आर. एन. पराडकर 


गुरुदत्त पाहिले कृष्णातिरी 

गुरुदत्त पाहिले कृष्णातिरी

शतदीप उजळले माझ्या उरी


चरण क्षाळिते कृष्णामाई
छत्र तरूची शीतल राई
गोड आरती खगगण गाती
भुलली स्वर्गपुरी !

यतिवेषे गुरुमूर्ती शोभली
अपार करुणा हृदयी भरली 
सूर्य चंद्रमा नयनी, वदनी 
शांतिसुमे साजिरी !!

प्रभूरायाची शुभद पाऊले
सेवाया सुर भूवर आले
माझ्या नयनांमधुनी झरती
प्रेमाश्रूंच्या सरी !!! 

आईचे भक्तिजीवन


नित्यपाठ आणि उपासना :

सकाळी स्नान झाले की आई  मनोबोधाच्या आरतीमधील खालील ओळी म्हणत असे:-


वेदांचे जे गुह्य शास्त्रांचे जे सार

प्राकृत शब्दांमाजी केला हा विस्तार


यापुढील ओळी मी कधी ऐकल्या नाहीत.


नंतर हा श्लोक म्हणत असे:


शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, 

वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, 

कवी वाल्मीकासारिखा मान्य ऐसा, 

नमस्कार माझा सद्गुरू रामदासा


शिवाय खालील श्लोक आई म्हणत असे:


मना तुला हे ब्रीद सांगतो समर्थ ग्रंथीचे 

ग्रंथराज भावार्थहि असा वदती गुरु वाचे

अनंत भावे स्मरण करोनी श्रीगुरुचरणांचे

तरीच जन्मा येउन केले सार्थक देहाचे

गुरुचरणाची गोडी तुजला किती सांगु वाचे

सेवक किंकर स्वच्छंदाने गुरुपुढती नाचे


हे सारे श्लोक समर्थ रामदासांशी संबंधित आहेत. हे श्लोक आई का म्हणत असे, कुणास ठाऊक.


कधीकधी घरात खूप अडचण, अर्थात पैशाची, आई खालील भजन म्हणत असे-

हा नको नको संसार, शिरावर भार

जाउनिया पंढरपुरी, रहावे सोडुनीया घरदार


खालील श्लोक मी आईच्या तोंडून ऐकले आहेत-


१. रामा तुझे कोमल नाम घेता

संतोष वाटे बहु फार चित्ता

बापा दयाळा मज भेट द्यावी

दारिद्र्यचिंता अवघी हरावी


२. श्रीरामचंद्रा करुणासमुद्रा

ध्यातो तुझी राजसयोगमुद्रा

नेत्री न ये रे तुजवीण निद्रा

कै भेटसी बा मजला समुद्रा


३. गणपति म्हणे वरेणियांनो

दुष्टांच्या संगती न लागावे

ज्याला मोक्षपदाची आवड

त्याने सदा मला गावे

आईला इतर कुठली उपासना, व्रत वैकल्ये करताना मी पाहिले नाही. आम्हाला जी काही स्तोत्रे शिकवली, ती अण्णांनी शिकवली. माझी बहीण शामा सांगते की आई तिला रामनाम घेण्यास सांगत असे. 

आईला कर्मकांड आवडत नसे आणि बुवाबाजीची तिला फार चीड होती. अण्णांचा धार्मिकतेकडे ओढा होता. त्यावर ती अंकुश ठेवून होती. धार्मिकतेच्या आहारी जाऊन अण्णा संसाराकडे दुर्लक्ष करतील अशी भीती तिला होती.

घरी काही सणवार असला आणि देवाला नैवेद्य दाखवायला सांगताना ती नेहमी म्हणत असे,' माझ्या मुलांच्या मुखाला लागलं की ते देवाला आपोआप मिळालं.'

शिरडीच्या साईबाबांवर श्रद्धा:

आईची साईबाबांवर खूप श्रद्धा होती. आमच्या घरी शिरडीहूनच आणलेला साईबाबांच्या मूळ मूर्तीचा एक फोटो होता. आई आम्हाला नेहमी सांगत असे, शिर्डीला बाबांचं मोठं मंदिर आहे. आपण एकदा शिर्डीला जाऊ. (पुढे आम्हाला शिर्डीला प्रथम नेलं ते रमेश मामाने.)

खडकी बाजारातील साईबाबांच्या देवळात जायला तिला आवडे. पण कुठलाही नियम किंवा पूजापाठ असा तिने कधी केला नाही.

आई तिच्या लहानपणीचा एक अनुभव नेहमी सांगत असे. 

एकदा तिच्या हाताला खूप सूज आली होती. रात्री तिला एक स्वप्न पडलं. स्वप्नात बाबांचे एक देऊळ होते आणि देवळात बाबा स्वत: होते. बाबांनी आईला समोरच्या झाडाचे फळ खाण्यास सांगितले.

आई म्हणाली, 'इतक्या वर फांदीपर्यंत माझा हात कसा जाईल? ' परंतु खरोखरच फांदीजवळ जाताच फांदी आपोआप खाली आली आणि आईने फांदीचे फळ तोडून खाल्ले. 

बाबांनी नंतर आरती करण्यास सांगितले.आई आरतीसाठी निरांजन शोधू लागली. परंतु बाबा म्हणाले,'माझ्या आरतीसाठी निरांजन लागत नाही. तेथील पणती घे.'

आईने पणती घेऊन बाबांची आरती केली आणि स्वप्न मोडले. त्यानंतर हाताची सूज उतरली.

माझ्या लहानपणीचा एक किस्सा आईने सांगितला. मला खूप ताप आला होता. रात्रीची वेळ होती. आई जागी होती. तिला झोप येऊ लागली. अचानक तिला बाबांचा दृष्टांत झाला,'झोपू नकोस, जागी रहा.' आई त्याप्रमाणे जागत राहिली. पहाटेपर्यंत माझा ताप उतरला.

मी मोठा झाल्यानंतर  एकदा अडचणीत असताना आईने बाबांना सांगण्यास सांगितले.  मी आईला म्हणालो ,' आपली कामं आपण करायची सवय ठेवली पाहिजे. प्रत्येक बाबतीत देवाला वेठीला धरणं बरोबर नाही ‌' 

यावर आईने  उत्तर दिलं,' आपलं काम आपल्यालाच करायचं आहे, पण थोडा भार बाबांवर टाकावा.'

मला वाटतं, साईभक्तीचं मर्म आईला कळलं होतं.

छंद आणि आवडीनिवडी:

रांगोळी:

आईला रांगोळी काढण्याची खूप आवड होती. दारात सडा घातला की रांगोळी काढण्याची पद्धत होती. रांगोळीमध्ये आई  इतर डिझाइन्समध्ये  कासव काढत असे.  

मुख्य रांगोळी काढणं होत असे दिवाळीत. दिवाळीचे चार दिवस रोज वेगवेगळी  रांगोळी काढण्याचा उत्साह असे. दिवाळीतच रांगोळीत रंग भरले जात. मोठ्या रांगोळीमध्ये सात कासवांची रांगोळी असे. या रांगोळीमध्ये मधल्या जास्तीत जास्त ठिपक्यांच्या ओळीत ३७ ठिपके असत. 

एका रांगोळी स्पर्धेत आईला पहिले बक्षीस मिळाले होते. हा  गालीचा आई नेहमी काढत असे. जसा आठवेल तसा खाली दिला आहे:


आईबरोबर रांगोळी काढताना आम्ही मुलं मदतीला बसत असू. आईबरोबर रांगोळी काढता काढता ही कला पुढे मी आत्मसात केली आणि रांगोळी मी काढू लागलो. 

चित्रकला:


आईची  चित्रकलाही चांगली होती. अंगणात दाणे टिपणाऱ्या चिमण्या पाहून तिने चित्र काढून त्याच उशीच्या अभ्र्यावर भरतकाम केलं होतं.

विणकाम, शिवण, भरतकाम वगैरे:

आम्ही तळेगावमध्ये असताना (साल १९६१-६२) आईने नॉव्हेल कंपनीचे सुईंग मशीन घेतले. घरातले शिवणकाम, तसेच छोटीमोठी शिवणाची कामे करून पैसे कमवण्याचा तिचा विचार होता. १९६२ मध्ये आम्ही खडकीला शिफ्ट झाल्यावर हे शिवणयंत्रही खडकीला आणले. तिथे तिने थोडंफार शिवणकाम केलं. पण चाळीतील वस्ती असा काही व्यवसाय करण्यास पोषक नव्हती. त्यामुळे या शिवणयंत्राचा पुढे काही उपयोग झाला नाही. एका खोलीमध्ये या शिवणयंत्राची फक्त अडगळ झाली होती आणि त्याचा उपयोग फक्त सामान ठेवण्यासाठी होता. पण आईची या शिवणयंत्राला फार अटॅचमेंट होती. १९८३ मध्ये आम्ही चिंवडगावात शिफ्ट झालो, तेव्हा हे शिवणयंत्रही बरोबर नेलं. तिथे केव्हातरी ते डिस्पोज केलं.

आई स्वेटरही विणत असे. मी तिसरीत असताना आईने मला हिरव्या रंगाचा फुलपाखराची वीण असलेला स्वेटर विणून दिला होता.

आईकडे भरतकामाची रिंग होती. आई उश्यांचे अभ्रे वगैरे असे किरकोळ भरतकाम करीत असे. आईकडे एक क्रोश्याची सुईसुद्धा होती.

टाकाऊतून टिकाऊ:

टाकाऊ गोष्टींतून टिकाऊ गोष्टी बनवण्याचा आईला छंद होता. प्रत्येक गोष्टीमध्ये तिला एक उपयुक्त वस्तू दिसे. सारे जुने कपडे एकत्र करून त्यांची ती गोधडी शिवत असे. या कामात आम्हीसुद्धा आईला मदत करीत असू. मे महिन्यात आमची मावसभावंडे सुधीर, सुशील कधी कधी राहायला येत आणि या कामात मदत करीत. 'पुढच्या वेळी आलो, की मी शिवलेली गोधडी मला पाहिजे,' असे सुशील सांगून जाई. 

कुठेतरी पडलेल्या चिंध्या वगैरे गोळा करून त्यापासून सॉफ्ट टॉइज बनवी. माझ्या मुलाला अद्वैताचा तिने असेच एक मांजर बनवून दिले होते. त्याला तो माऊ म्हणत असे. एकदा में महिन्यात आम्ही पुण्याला चाललो होतो. (तेव्हा आम्ही मिरा रोडला राहत होतो). तेव्हा अद्वैतने भोकाड पसरलं की, 'माऊला सुद्धा बरोबर न्यायचं.'

कुठे उपयुक्त काही वाचनात आलं की ती कात्रण काढीत असे, वहीत चिकटवून ठेवीत असे. त्या वेळी गृहलक्ष्मी, माहेर अशी मासिकं होती. मला त्यांतून एखादी पाकक्रिया उतरून घेण्यास सांगत असे. पूर्वी सकाळमध्ये येणाऱ्या चिंटूच्या कॉमिक स्ट्रिप्स प्रसिद्ध होत्या. त्यांची तिने कात्रणवही बनवून अद्वैतच्या नावाने सकाळला पाठवून दिली होती. आम्ही आईबरोबर पत्तेसुद्धा खेळत असू. आई आणि अण्णा अद्वैतबरोबर पत्ते खेळत असत.

हीच गोष्ट खाद्यपदार्थांच्या बाबतीत. शिळा पदार्थ राहिला की त्यापासून ती काहीतरी वेगळा पदार्थ बनवीत असे. आई तिच्या लहानपणीची एक आठवण सांगतो असे. एकदा रात्रीचे शिळे वर्ण राहिले होते. आईने त्यातील पाणी काढून टाकले आणि त्याची भजी बनवली. सर्वांनी भजी आवडीने खाल्ल्यावर आईने सांगितलं की ही भजी शिळ्या वरणाची होती. तेव्हा सर्वांना वाटलं‌ की 'अरे, आधी कळलं असतं तर खाल्ली नसती.'

प्राणी पाळण्याची आवड:

आईला पाळीव प्राण्यांची फार आवड होती. आम्ही खडकीला असताना जवळ जवळ सगळे प्राणी पाळून झाले.

कोंबड्या:
चाळीमध्ये बऱ्याच जणांनी कोंबड्या पाळल्या होत्या. त्यामुळे आईलासुद्धा कोंबड्या पाळण्याची कल्पना सुचली. प्रथम दोन कोंबड्या आणल्या. आमच्या बाजूला असणाऱ्या दुसऱ्या गोपीचाळीत एक बोहरी मुसलमान बाई राहत होत्या. त्यांच्या मोठ्या मुलाला सारे बाबू म्हणत. त्यामुळे आई त्यांना बाबूच्या आई म्हणत असे. कुक्कुटपालनात बाबूच्या आई मुख्य सल्लागार होत्या. त्यांनी सांगितले की कोंबड्यांना तुमच्या घराची सवय व्हावी म्हणून दोन्ही कोंबड्यांना थोडा वेळ दारात बांधून ठेवा. त्याप्रमाणे दोन्ही कोंबड्यांच्या एकेका पायाला लांब दोऱ्या बांधून ठेवल्या. त्याच दिवशी माझा एक वर्गमित्र घरी येऊन गेला, जेव्हा मी घरी नव्हतो. दुसऱ्या दिवशी तो मला वर्गात विचारत होता, 'तुम्ही कोंबड्या पाळल्या आहेत ना? तुमच्या दारात दोन कोंबड्या बांधल्या होत्या.' मी म्हटलं, ' त्या आमच्या दारात नसतील. तुझी पाहण्यात चूक झाली असेल' आणि जास्त वाच्यता होऊ दिली नाही. नाहीतर वर्गात माझी फजिती झाली असती.

या दोन कोंबड्यांपैकी एक पांढरी होती तर दुसरी काळी पण पिकांवर पांढरे ठिपके असलेली होती. या पांढऱ्या कोंबडीला रोग झाला आणि ती मरण पावली. या रोगाचे लक्षण म्हणजे कोंबडीला हिरव्या रंगाची शौच  होई.  कोंबड्यांचा मृत्यू पाहणे अतिशय क्लेशदायक असे. बहुधा रात्रीच्या वेळीच त्यांना अटॅक येई. त्या खूप फडफड करून मान वाकडी करून प्राण सोडत.

साधारण वीस-एकवीस दिवस अंडी देऊन झाली की कोंबडी त्या काळात श्रमाने खुडूक बसे, म्हणजे नुसती बसून राही. याच काळात तिला अंड्यांवर बसवून पिलं होतात. काळ्या कोंबडीला आईने  जयाच्या आई म्हणून एका शेजारणीला मान देऊन तिच्या शुभ हस्ते अंड्यांवर बसवले. एकवीस दिवसांनी सात पिले झाली. त्यांतील चार कोंबडे होते तर तीन कोंबड्या होत्या. एक कोंबडी कासवासारखी दिसायची , म्हणून तिचं नाव कासवी ठेवलं. दुसरी डार्क काळी होती, ती पकपक असं ओरडायची, म्हणून  तिचं नाव पकपक ठेवलं. तिसरी पांढऱ्या रंगाची होती, म्हणून तिला नुसतंच पांढरी कोंबडी म्हणत असू. कोंबड्यांपैकी एक तांबूस रंगाचा होता, त्यामुळे त्याला तामस्या नाव ठेवलं. दुसऱ्याच्या पाठीवर काळा डाग होता, म्हणून त्याला काळा डाग नाव दिलं. तिसऱ्याच्या पाठीवर लाल गंध टाकून लालू तर चौथ्याच्या पाठीवर निळी शाई टाकून त्याला निळू नाव दिलं.

पिलं असताना कोंबडी फार आक्रमक होते आणि कोणी आपल्या पिलांना काही त्रास देतं का यावर लक्ष ठेवून असते. आमची कोंबडी फारच आक्रमक होती आणि बहुतेकांनी तिचा धसका घेतला होता. कोंबडी सतत पिलांना बरोबर घेऊन फिरते आणि पिलंही आईबरोबर राहतात. पहिलं मोठी झाली की स्वतंत्र होतात आणि मग आई म्हणजे त्यांना इतर कोंबड्यांसारखी एक. तीच गोष्ट आईच्या बाबतीतही.

एकदा सकाळी लालू आम्हाला जमीनीवर पडलेल्या स्थितीत आढळला. तो चालू शकत नव्हता. कुणीतरी सांगितलं की त्याच्या पायांवर सायकल गेली. पण ते खरं वाटत नाही. चाळीतील लोकांचे आमच्याशी चांगले संबंध नव्हते. कुणीतरी त्याच्या पायांवर काहीतरी मारून त्याला पांगळा केलं असावं. त्याला घरी आणून आम्ही टोपलीत ठेवलं. तो खाऊन तेथेच शौच करीत असे. त्यांचे ते हाल बघवेनात. त्यामुळे अखेर त्याला कापण्याचा निर्णय घेतला. ही कामगिरी बाबूच्या वडिलांनी पार पाडली. त्यांना थोडे मांस देऊन बाकी आमच्याकडे आणलं. आम्हाला खूप वाईट वाटलं आम्ही ते खाऊ शकलो नाही.

कोंबड्या दिवसभर बाहेर चरायला जायच्या आणि रात्री घरी यायच्या. त्यामुळे कुठे बाहेर जायचं असलं की कोंबड्यांना शोधून घरी आणून झाकून ठेवायला लागायचं.

पुढे काही कोंबडे विकले. कोंबड्या अंड्यांसाठी ठेवल्या. कोंबड्या असताना त्यांच्या अंड्यांपासून थोडेफार पैसे मिळत. एका अंड्याचे तेव्हा चार आणे म्हणजे पंचवीस पैसे मिळत. नंतर कोंबड्या पाळल्या नाहीत.

मांजर:
आमच्या घरी एक मांजर येऊन बसत असे. तिला आश्रय देणं महागात पडलं कारण ही मांजर व्याली आणि तिला तीन पिलं झाली. सुरुवातीला ही पिलं अगदी उंदराच्या आकाराची होती. पण ही पिल्लं मोठी होऊ लागली, तशी आम्हाला काळजी पडली की या पिलांच्या मांजरी झाल्यावर एवढ्या मांजरी कशा सांभाळणार. एका शेजारणीने एक पिलू घेण्याची तयारी दाखवली. त्याप्रमाणे एक पिलू तिला दिले. तेव्हा बाकी दोन पिले फार अस्वस्थ झाली आणि शामाच्या (बहिणीच्या) परकराला ओढून तिला त्या शेजारणीच्या घरी चलण्यास सांगू लागले. शेजारीणसुद्धा म्हणाली की पिलू अजून रुळलं नाही , थोडा वेळ तुमच्याच घरी असू द्या. म्हणून ते पिलू पुन्हा घरी आणलं. त्यावेळी त्याच्या डोळ्यांत अगदी माणसासारखे अश्रू होते. पण थोड्या वेळाने ते पिलू आम्ही परत नेऊन दिलं.

इतर दोन पिकांमध्ये एक तांबूस रंगाचे आणि दुसरे अशासारखे पांढऱ्या रंगाचे होते. दोघाची सतत मस्ती चालत असे. एकमेकांना पुढच्या दोन पायांनी पाडून दुसऱ्याच्या पोटात मागच्या दोन पायांनी लाथा मारत. आपण बाजूला उभे असलो की मान वर करून तोंडाकडे पाहत. 

यांतील तांबूस पिलू पुढे काही कारणाने मरण पावलं. पांढऱ्या पिलाला पायाजवळ काही कारणाने जखम झाली आणि ती चिघळत गेली. एके दिवशी पहाटे त्याचा प्राण गेला. दादा (मोठा भाऊ ) असं सांगतो की त्या दिवशी पहाटे ती मांजर  (या पिल्लांची आई, आम्ही नंतर हिला बाहेर ठेवलं होतं) दारावर जोरात धडका मारत होती.

कोंबडा: 
एकदा असाच कुणाचा तरी कोंबडा आमच्या दाराशी आला. ज्याचा कोंबडा होता, तो न्यायला येईल, म्हणून आम्ही थोडे दिवस वाट पाहिली. कुणी न्यायला तर आले नाहीच, पण आमच्याकडे तो कोंबडा पाहून सारे त्याला आमचा कोंबडा समजू लागले. त्याचं नाव 'बल्लू' ठेवलं. याला कणिक भिजवून तिचे तुकडे आम्ही खायला घालत. हातात कणिक पाहिली की बल्लू दुरूनच आपले पोट हलवीत दुडू दुडू धावत यायचा. बल्लू थोडा विक्षिप्त होता. कारण अचानक धावत येऊन कुणाच्याही पायाच्या अंगठ्यावर चोच मारीत असे. त्यामुळे पाहुण्यांनाही पाय सांभाळायला सांगावे लागत असे.

कुत्रा:
कुत्रा पाळला तेव्हा सचिन (धाकटा भाऊ) लहान होता. त्यालाच कुत्र्याचा जास्त लळा होता आणि तोच त्याची काळजी घेत असे. तो कुत्र्याला मोती म्हणत असे.

पोपट:
ही आईने सांगितलेली हकीकत आहे. एकदा दाराशी एक भिकारीण आली होती. तिच्याबरोबर तिचा लहान मुलगा होता आणि त्याच्या हातात एक पोपटाचा पिंजरा होता. तिने पोपट घ्यायचा का, म्हणून विचारलं. आईला घ्यायचा नव्हता, म्हणून आईने 'दे पाच रुपयाला' म्हणून सांगितलं. त्या भिकारणीने तो पिंजऱ्यासकट पोपट लगेच पाच रुपयाला देऊन टाकला. आईने विचारलं की तुझ्या मुलाला एवढी आवड आहे, तर कशाला देतेस? त्यावर त्या भिकारणीने उत्तर दिलं की आम्हालाच खायला नाही तिथे आम्ही काय या पोपटाला खायला घालणार? त्याला जर चांगलं घर मिळालं तर त्याचं तरी चांगलं होईल.

अशा प्रकारे पोपट आमच्या घरी आला. पोपटाला मिरची, डाळ असे पदार्थ आवडतात. पण या पोपटाला आम्ही खाऊ तेच लागायचं. ताटात खायला घेतलं की तो दांडीवर नाचायला लागायचा. त्याला आमटीत चपाती बुडवून दिली की तो डोळे फिरवून आनंददर्शक विशिष्ट शिट्टी वाजवून खुषीत खायचा. त्याला गोड शिराही आवडत असे. हा पोपट आईवर एकसारखी नजर ठेवून असायचा. आई जरा नजरेआड झाली की पिंजऱ्याच्या जगाला पकडून जिवाच्या आकांताने टाहो फोडायचा. त्याला मोकळा सोडल्यावर तो इथे तिथे फिरत असे. कारण त्याला उडता येत नसे. आम्ही एकदा मुंबईला गेलो तेव्हा मी पोपटाला माझ्या एका मित्राकडे ठेवला होता. पण नंतर आम्ही त्याला पिंजऱ्यातच खायला ठेवून घरातच ठेवून जात असू. तोही शांतपणे पिंजऱ्यात बसून राहत असे.

या पोपटाने आमच्या घरातील खूप चढउतार पाहिले. कारण आमच्या घरातील मुख्य चढउतार १९८१-९० या दशकातच झाले. हा पोपट घरी आला तेव्हा मी सी. ए. करीत होतो, म्हणजे १९८०-८१ साल असेल. नंतर मी सी. ए. झालो, अण्णा निवृत्त झाले,  दादाला नोकरी लागली, आम्ही चिंचवडगावच्या जागेत राहायला आलो वगैरे.  नंतर मी चिंचवड स्टेशनला जागा घेतली. दादा, शामा, मी अशी आमची लग्नं झाली. नंतर आई-अण्णा पुन्हा खडकीच्या जागेत राहायला गेले, तेव्हा पोपट त्यांनी बरोबरच नेला.

या पोपटाचा शेवट मात्र काळजाला चटका लावणारा झाला. अण्णांनी पिंजरा धुवून पोपटाला अंघोळ घातली . अशा वेळी तो ओल्या अंगाने पिंजऱ्यात येऊन बसायचा. त्याच वेळी कुठून तरी एक बोका आला आणि एक झडप घालून पोपटाला खलास केला. त्याने शेवटची हृदयद्रावक किंचाळी फोडली. ही तारीख १५ सप्टेंबर, म्हणजे दादाचा वाढदिवस होता, एवढं मला आठवतं. साल १९८९ असावं, कारण माझं लग्न १९८९ साली झालं आणि आई-अण्णा याच सुमाराला खडकीला राहायला आले.

प्राणी पाळायला घेतले की ते आपल्या घराचे सदस्य होतात. त्यांना जीव लावल्यावर  त्यामुळे त्यांचे मृत्यू पाहणं आणि स्वीकारणं फार क्लेशदायक असतं. ज्यांनी प्राणी पाळले आहेत, त्यांना याचा अनुभव असतो.

लहान मुलांची आवड:

आईला लहान मुलांची खूप आवड होती. लहान मुलांना गोळा करून गप्पागोष्टी , गाणी-कविता, विनोद सांगणे, पत्ते खेळणे तिला आवडत असे. यामुळे नातवंडांत ती चांगली मिसळत असे.

खाणे-पिणे:

आईला फळांमध्ये पपई आवडत असे. लोणच्यांमध्ये तिला लिंबाचं लोणचं आवडत असे.

हास्यविनोद:
आईला विनोदाची खूप आवड होती. साध्या साध्या गोष्टींवर तिला खूप हसू येई. हसताना तिच्या डोळ्यांतून पाणी येत असे. कधी कधी तर आम्ही आईला विचारत असू की, 'यात एवढं हसण्यासारखं काय आहे?' रमेशमामा (आमचा मामा, आईचा धाकटा भाऊ) हासुद्धा विनोदी आणि खेळकर स्वभावाचा होता. त्यामुळे रमेशमामा आला की त्यालासुद्धा विनोदांचा हसण्यासाठी एक खात्रीशीर मेंबर मिळत असे. दादा कोंडके हा दोघांचा आवडता नट होता.

पण या खेळकर स्वभावामुळे आईला कठीण प्रसंगावर मात करणे शक्य झाले होते. कुठलाही कठीण प्रसंग आला तर काहीतरी विनोद करून आई त्यांची तीव्रता कमी करीत असे.

स्वयंपाक:

आई अतिशय चांगला स्वयंपाक करीत असे. स्वयंपाकाबद्दल सांगायचं तर ती पाण्याला चव आणते असे. घरात तसे फारसे काही नसे. एक हळदतिखटाचा डबा तेवढा होता. पण मुख्य म्हणजे आईने कोंड्याचा मांडा करून आम्हाला वाढवलं. कारण अण्णांचा पगार पुरत नसे. महिनाअखेर हा भयानक कालखंड असे. अण्णा दुकानदारांकडून उधार सामान मिळवण्यासाठी , उसने पैसे मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत. शाळेची वेळ झाली की आम्ही शाळेचा गणवेष चढवून तयार होत. मग आई खूप वैतागत असे, 'हे कामावर निघून गेले. त्यांना आहे का मुलांची काळजी?' मग कुठल्यातरी डब्यांतून काहीतरी शोधून काहीतरी बनवून आम्हाला वाढत असे. 

आमचं दोन वेळेच्या खाण्याशिवाय काही खाणं काही नसे. त्यामुळे जेवताना भूक चांगली लागते असे. जेवायला भरपूर लागत असे. पण रेशनच्या अन्ना धान्याला कस नव्हता. त्यामुळे आम्ही दिसायला पाप्याची पितरंच होतो. आई म्हणत असे,'खातात सात सुपं, दिसतात माकडाची रूपं.' शाळेत सुद्धा शिक्षक विचारीत, ' तुम्ही मुलं जेवत नाही का?' आम्हाला बेलसरे नावाच्या बाई होत्या. त्या म्हणत,' त्या मुलांशी मस्ती करू नका. फुंकर मारली तर ती मुलं उडून जातील.'

एका वेळेला एक-दीड किलोच्या चपात्या बनवायला लागत. आई भाकऱ्यासुद्धा अतिशय चांगल्या बनवत असे. भाकऱ्या अगदी मोठ्या आणि कंपासने आखाव्या अशा वर्तुळाकार असत.

आईच्या पालेभाज्यांची अजून सारे आठवण काढतात. एकदा आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत दीदीमावशीकडे  (आईची धाकटी बहीण. हिचे नाव कमल होते, पण तिने आम्हाला दीदीमावशी म्हणायला सांगितले  होते)  गेलो असता, आईने  त्यांच्याच घरी लावलेला पुदिना काढून त्याची चटणी बनवली. तेव्हा दादाकाका  ( दीदीमावशीचे यजमान) फार खुष झाले आणि आई स्वयंपाक करीत असली की आवर्जून सांगत , 'तुम्ही बनवता तशी चटणी बनवा.'

भाज्या कापण्यासाठी सुरुवातीला एक लोखंडी विळी होती. नंतर दीदीमावशीने स्टेनलेस स्टीलची विळी घेतली. आम्ही भाज्या कापण्यासाठी सुरी वापरत नव्हतो. आई विळीवर पालेभाज्या अतिशय बारीक चिरीत असे.

सुरुवातीला आम्ही चुलीवर स्वयंपाक करीत असू. नंतर पितळी स्टोव्ह,  वातीचा स्टोव्ह झाले. चाळीतील भिशीत आईचा एकदा पहिलाच नंबर लागला आणि आईने अण्णांना गॅसची चौकशी करण्यास सांगितले. गॅसला तेव्हा नंबर लावावा लागत असे. पण सुदैवाने खडकी बाजारात हिरालाल मेहताकडे गॅस अव्हेलेबल असल्यामुळे लगेच मिळाला. मग सिलिंडर संपल्यावरच स्टोव्ह काढावा लागत असे. कोळसा, लाकडं, रॉकेल वगैरे आणण्याचं काम वाचलं.

घरात वाटण करण्यासाठी दगडी पाटा-वरवंटा होता. त्यावर मिरची, कोथिंबिरीचे वाटण होत असे. होळीच्या दिवशी अण्णा त्यावर नारळ वाटून नारळाचे दूध काढीत. नंतर मीसुद्धा पाट्यावर वाटण करीत असे. स्वयंपाकामध्ये अण्णा आईला खूप मदत करीत.

आंबटवरणात कणकेच्या छोट्या कच्च्या पोळ्या टाकून बट्ट्या बनवीत असे. विदर्भाकडे या पदार्थास वरणफळे म्हणतात. गुजराती लोक दाळ  ढोकळी  म्हणून हा पदार्थ बनवतात. डाळीच्या पिठाचे गोळे उकळत्या पाण्यात टाकून गोळवणी हा प्रकार बनवीत असे. आंबटवरणात वांगी घालायची (सांबार नाही), कोबीची भाजी बनवली तर त्यात चण्याची डाळ घालायची, अशा प्रकारे स्वयंपाकात विविधता आणण्याचा प्रयत्न आई करीत असे.

झाशीला राहत असताना आई आलू - दमची (छोट्या बटाट्यांची सुकी) भाजी शिकली. ही भाजी आई बनवीत असे. आज हॉटेलमध्ये मिळणाऱ्या भाजीपेक्षा ही वेगळी भाजी होती आणि जास्त चवदार होती.याशिवाय सुकी फ्लॉवरची भाजी आणि फुलके बनवीत असे.

सणावाराचे सर्व पदार्थ - संक्रांतीला भोगीची भाजी, तिळाचे लाडू, हलवा, श्रावणात घारगे, आरत्या, गणपतीला उकडीचे मोदक , दिवाळीच्या फराळाचे पदार्थ - आई बनवीत असे.

आईला सुकी मासळीसुद्धा आवडत असे. त्यामुळे सोडे, बोंबील, सुकट या पदार्थांचे कालवण ती चांगले बनवीत असे. शिवाय सुकी मासळी तळून किंवा तव्यावर थोड्या तेलावर परतूनही खाता येत असे. नॉन व्हेजमध्ये चिकन, मटण, मासे तळणे, माशांची चालवणे चांगली बनवीत असे. नाना मामा आणि रमेशमामा (आमचे मामा) आईच्या हाताच्या मटणाची तारीफ करीत असत.

आई आजारी पडण्यापूर्वी घरात वाळवण खूप करीत असे. कुरडया, पापड्या, पापड, मिरच्या, बटाट्याचा कीस, सांडगे, उसरी (ताकात वाळवून सुकवलेल्या भाज्या ) असे बरेच पदार्थ बनवून ठेवत असे. कुरडया बनवून ठेवल्या की राहिलेल्या गव्हाच्या चोथ्यापासून भुसवड्या बनवीत असे. भात शिल्लक राहिला की त्याचे सांडगे घालून टाकत असे. भाजीचे सांडगे ती बनवीत असे. आज सुपरमार्केटमध्ये   'अमृतसरी वडी' म्हणून या    सांडग्यांसारखा    पदार्थ मिळतो.

आईने आम्हाला स्वयंपाक शिकवून ठेवला. नंतर आई खूप आजारी असे. त्यावेळी आम्हाला या पाककलेचा खूप उपयोग झाला, आताही होतो.

सणवार:
आई बहुतेक सर्व सणवार करीत असे. या बाबतीत ती आजीचं अनुकरण करीत होती.

संक्रांत: संक्रांतीला रात्री जागून तीळगूळ, तिळाचे लाडू बनवत असे. भोगीला भोगीची भाजी बनवत असे.

गुढीपाडवा: गुढीपाडव्याला अण्णा पुण्याला जाऊन निर्णयसागर पंचांग घेऊन येत असत. त्यांनी त्यांच्याकडे सर्व वर्षांची पंचांग ठेवली होती. आल्यावर बांबूच्या काठीला (एरवी या बांबूचा उपयोग कपडे वाळत घालण्यासाठी होत असे) खण बांधून, हार, गाठ्या लावून, कडुलिंबाची पाने लावून वर तांब्या उपडा टाकून अण्णा गुढी उभारत. कडुलिंबाचं महत्त्व सांगत. कडुलिंबाच्या वाटलेल्या पानांमध्ये थोडा गूळ टाकून त्याची गोळी बनवून आम्हाला खायला देत.

श्रावण महिना: श्रावण महिना तर कधी येतो असे आम्हाला होतं असे.

आईचे संस्कार आणि शिकवण:

अचकट विचकट पुरुषांना 👿 कसे तोंड द्यावे :


एक मुलगी म्हणून आणि आपण रहात असलेली वस्ती लक्षात घेऊन तिने माझ्यावर डोळ्यात तेल घालून वाढवले, संरक्षण केले, समाजात वावरण्याच्या  टिप्स दिल्या आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन कसे जगावे याचे धडे दिले. त्याचा मला या वयातही उपयोग होतो. नील झाल्यावर मुलांचं मानसशास्त्र, त्यांच्या वाढत्यावयातला आईचा रोल याच मार्गदर्शन खूप उपयोगी पडतं.

या बाबतीत मलाही आठवते. कुणी स्त्रियांशी अचकट-विचकटपणा करीत असेल तर आई तिचे मत सांगत असे की स्त्रीच्या नजरेतच अशी जरब असली पाहिजे की अशा पुरुषांची हिम्मतच होता कामा  नये. 

🌺 अन्नाला माजू नये:
अन्न फुकट जाऊ नये, याबद्दल आई फार दक्ष असे.माणसाचं एखादा पदार्थ अगदी नाइलाजाने टाकावा लागला तर ती फार हळहळत असे. जेवताना आपल्याला हवं तेवढंच मागून घ्यावं आणि पानात काही टाकू नये, ही शिकवण आमच्या मनावर आईने ठेवली. आई सांगत असे, की अन्न ही घरची लक्ष्मी आहे आणि तिचा अनादर केला तर ती निघून जाते. प्रत्येक गोष्ट उदाहरणासहित पटवून देण्याच्या सवयीप्रमाणे त्यांच्या एका शेजाऱ्याचे ती नेहमी उदाहरण देत असे.

कल्याणला राहत असताना त्यांचे वढावकर नावाचे एक शेजारी होते. त्यांच्या घरची फार सुबत्ता होती. त्यामुळे ते स्वयंपाकासाठी सारे उच्च दर्जाचे साहित्य आणून पदार्थ बनवीत. पण शिल्लक राहिले तर हे सारे उकिरड्यावर फेकून देत. ते पाहून आई सांगते की आम्हाला फार वाईट वाटे. पुढे या वढावकरांची परिस्थिती फिरली आणि त्यांना अन्नान्न दशा आली. पूर्वी वाण्याच्या दुकानात ज्यांना काही काम नाही असे लोक बसत असत. वढावकर असे दुकानात जाऊन बसू लागले. तेव्हा रॉकेलचे मोठे पत्र्याचे चौकोनी डबे मिळत. मग कुणी गिऱ्हाइकाने डबा घरी पोहचवण्यास सांगितले की असे लोक ही कामे करीत‌. 

गिऱ्हाईक बक्षिसी म्हणून चार-आठ आणे हातावर ठेवी. आई सांगत असे की एके काळी संपन्नतेत राहणाऱ्या गृहस्थांस असे खांद्यावर रॉकेलचे डबे वाहताना पाहून आम्हाला अतिशय वाईट वाटत असे.

 🌺 तोंड चांगलं पाहिजे 

आईला लहान मुलांची खूप आवड असल्याने आई आली की लहान मुलं तिच्याभोवती गोळा होत. परंतु ऐपत नसल्याने आई कुणासाठी खायला, कापड, कपडे असं काही घेऊ शकत नसे. त्याचं तिला फार वाईट वाटे. मुलांना ती म्हणत असे,' मी तुमच्यासाठी काहीच आणत नाही, मग तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम का करता?'

आई त्यामुळे आम्हाला नेहमी सांगत असे की ,'माणसाकडे काही नसलं तरी चालेल, पण त्याचं तोंड चांगलं पाहिजे. तोंड चांगलं असणारा मनुष्य काही नसेल तरी सर्व काही मिळवतो. उलट तोंड चांगलं नसणारा मनुष्य मिळवलेलं सर्व काही एका क्षणात गमावून बसतो.'

नात्यातील स्त्रियासुद्धा आईच्या या  गुणाचा उल्लेख करीत की,' तुम्ही आम्हाला कधी तोडून बोलत नाहीत की टोमणे मारीत नाहीत.'

🌺 कुणाला हसू नये

कुणाच्या हसू नये असे आई आम्हाला नेहमी सांगत असे. आपण जे बोलतो ते नियती ऐकत असते. आपण कुणाला हसलो, तर नियती म्हणते, तू दुसऱ्यांना हसतोस का? थांब, आता तीच गोष्ट तुझ्या पदरी देते. आणि नंतर खरोखरच ती गोष्ट आपल्या पदरी येते.

🌺 कुठल्याही माणसाची एकदाच पारख करावी:

🌺 जुन्या गोष्टी विसरून जाव्यात, एकसारख्या उगाळत बसू नये:

🌺 सर्वधर्मसमभाव:
आमच्या चाळीमध्ये सर्व धर्मांचे आणि जातींचे लोक होते. चाळीतील बायका संक्रांतीचे हळदीकुंकू करताना फक्त हिंदू शेजारणींना बोलावत असत. परंतु माझी आई धर्म, जात असा कुठलाच फरक न करता बायकांना हळदीकुंकवाला बोलावीत असे.

आईने सांगितलेल्या आठवणी आणि गोष्टी: 

श्रद्धेचे फळ 🙏 


आमचे आजोबा - कै. शंकर यशवंत राजे 

हा किस्सा आमच्या आईने सांगितलेला आहे. आईच्या वडलांचा म्हणजे माझ्या आजोबांचा देवावर विश्वास नव्हता. परंतु ते देवपूजा नियमित करीत. ते देवपूजा करीत असताना शेजारील एक  मुसलमान बाई  तेथे नियमित येऊन बसे. तिला ही   पूजा फार आवडे. तिच्या मुलीला एकदा खाकमांजरी झाली, म्हणजे काखेत गाठ आली. तिने आजोबांना सांगितले की ' तुम्ही पूजा करता तेव्हा तुमच्या पूजेतील थोडे कुंकू मला द्या. त्या कुंकवाने माझ्या मुलीची खाकमांजरी बरी होईल.' आजोबांचा या गोष्टीवर विश्वास नव्हता. ते म्हणाले  की 'अशी काय खाकमांजरी बरी होईल का? मुलीला चांगल्या दवाखान्यात घेऊन जा आणि इलाज कर.' परंतु ती गरीब असल्याने बहुधा तिला इलाजाचा खर्च परवडणारा नसावा. तिने फारच आग्रह केला तेव्हा आजोबांनी चिमूटभर कुंकू उचलून 'हे घे' म्हणून तिच्या हातावर आपटले. तिने ते श्रद्धेने हातावरून काळजीपूर्वक पुसून कागदाच्या पुडीत भरून घरी नेले. हे कुंकू तिने नियमित खाकमांजरीला लावले आणि तिच्या मुलीची खाकमांजरी बरी झाली. नंतर तिने येऊन आजोबांना ही चांगली बातमी सांगितली.


 भुजंगाच्या गंडमाळा

हा प्रसंग आमच्या आईने आम्हाला सांगितला आहे आणि तिला तिच्या आईने म्हणजे आमच्या आजीने सांगितला आहे.

ही आजीच्या आजोबा-पंजोबा कुणाची तरी गोष्ट आहे. ते व्यवसायाने वैद्य होते की त्यांना औषधांची माहिती होती, माहीत नाही.

एक दिवस देवपूजा करीत असताना देवाच्या चौरंगाखाली का बाजूला त्यांना एक भुजंग वेटोळे घालून बसलेला दिसला. प्रथम त्यांना भीती वाटली, परंतु तो अगदी निपचित पडून आहे, हे पाहिल्यावर त्यांची भीड चेपली.

नीट पाहिल्यावर त्यांना असे दिसले की त्याला गंडमाळा झाल्या होत्या. आजोबांना त्याची दया आली गंडमाळेवर उपाय असणारी औषधी मुळी सहाणेवर उगाळून त्यांनी त्या भुजंगाच्या गंडमाळांवर औषधी लेप लावला. तो भुजंग तेथून निघून गेला.

दुसऱ्या दिवशी आजोबांना तो पुन्हा त्याच दिवशी दिसला. आजोबांनी पुन्हा त्याच्या गंडमाळांना औषधी लेप लावला.

अशा प्रकारे तीन-चार दिवस नियमित तो भुजंग येत होता आणि आजोबा त्याच्या गंडमाळांना औषधी लेप लावत होते.

एक दिवस आजोबांना दिसून आले की भुजंगाच्या  गंडमाळा बऱ्या झाल्या आहेत आणि भुजंग आजोबांकडे कृतज्ञतेने पाहतो आहे.

आजोबांनी त्याला प्रार्थना केली की 'तुझ्या वंशातील कुणीही माझ्या वंशातील कुणाला दंश करून नये.' भुजंगाने जणू काही आजोबांची प्रार्थना ऐकली आणि तो तेथून निघून गेला.

त्यानंतर तो भुजंग आजोबांना कधी दिसला नाही.

दादा :
आजीचे वडील म्हणजे आपले पणजोबाची गोष्ट आहे...ते वैद्य होते..आजीचे माहेरचे आडनाव वैद्य...पणजोबाना एक भुजंग स्वप्नात दिसला, त्याला गंडमाळा झाल्या होत्या व तो त्यावर उपचार कर असे सांगू लागला..त्यावर पणजोबा नी त्याला प्रत्यक्ष यायला सांगितले...दुसऱ्या दिवशी पणजोबा पूजा करताना त्यांना फुस्स असा आवाज आला..तो भुजंग प्रत्यक्ष आला होता..त्याच फणा सुपा एवढा होता व अंगावर बोट बोट केस होते..पणजोबा नी बघून उपचार चालू केले सहाने वर उगाळून पणजोबा लेप करायचे व त्याच्या मानेला लावायचे..काही दिवसात तो भुजंग बरा झाला व सांगितल्या प्रमाणे वरदान दिले.

चाळीत झालेला खून 🗡️ 

आई लहानपणी एका चाळीत राहत असताना त्यांचा शेजारी खून‌ करून रात्री एका दलदलीतून चालत आला होता. त्याच्या बायकोने रात्रीतल्या रात्रीत त्यांचे कपडे धुऊन टाकले. 

पोलीस चौकशीला आले. त्यांनी आजोबांनाही प्रश्न विचारले. आजोबांनी सांगितले की ,'मी सकाळी कामावर जाऊन रात्री घरी येणारा मनुष्य आहे. मला माझ्या कामाव्यतिरिक्त कुठलीही माहिती नाही.'

त्या वेळी एका पोलीसाने त्यांना सांगितलं की ,'तुम्ही चांगले लोक दिसता.अशा वस्तीत कशाला राहता?'
त्यामुळे आजोबांनी मनावर घेतलं आणि ती जागा बदलली.

नानामामाला भुते दिसत 👻 
आईने सांगितलं की नानामामाला भुते दिसत. नवरात्रामध्ये म्हणे भुतांचा मुक्त संचार असतो. एकदा नवरात्रामध्ये नानामामा व्हरांड्यात झोपला असताना त्याला एक भूत व्हरांड्यावर खाली पाय सोडून बसलेले दिसले. नाना मामा घाबरून घरी आला.

घरात झालेला चोरीचा प्रयत्न:
आजी-आजोबांच्या घरी एकदा चोरीचा प्रयत्न झाला होता. एका खोलीला भोक पाडण्यात आलेले आजीच्या लक्षात आले. तिने मुला-मुलींना मदतीला घेऊन ताबडतोब त्या खोलीतील सारे सामान दुसऱ्या खोलीत हलवले. नानामामाचा सर्व प्रकारच्या मुलांमध्ये वावर होता. त्याने हे चोर कोण होते ते शोधून काढले होते.


©Dr Hemant Junnarkar, All rights reserved
(टीप: या पोस्टमधील कवितांवर  आमचा कोणताही हक्क नाही. या कवितांचा पूर्णतः हक्क त्यांचे मूळ लेखक/कवी/ प्रकाशक यांचा आहे. ही पोस्ट फक्त मनोरंजन/वाचना  साठी केलेली असून या पोस्ट द्वारे आम्ही कुठल्याही प्रकारे त्यांच्या या लिखाणावर हक्क दाखवत नाही आहोत.)

 


आमचे अण्णा - एक भावपूर्ण स्मरण

आमचे अण्णा - एक भावपूर्ण स्मरण कै. पंढरीनाथ दत्तात्रेय जुन्नरकर  (१७/१०/१९२२-१/२/२०१४) माझे वडील कै. पंढरीनाथ दत्तात्रेय जुन्नरकर एक ननअत्यं...