मंगळवार, २४ जानेवारी, २०२३

MISCELLANEOUS

MISCELLANEOUS

Bhabhi and Sanjal 

Hi Bhabhi Sanjal

You are kind like an angel

Hi Kishan,

You are the magnanimous person

In your house, we landed

And like royal guests, we were treated

Your hearts are full of sunshine

Your nature is pure and fine

Please come to our nest

And give us an opportunity to serve you to our  best

Shower our house with your kindness

And let us relax in that unparalleled bliss

खुषी और गम

फूल और काँटों का होता है अनोखा रिश्ता

अगर गम न होते तो खुषी का मजा क्या होता

दिवाळी

रंगीबेरंगी दिव्यांनी

झगमगते घर घर

गरिबाच्या घरी

हसतो अंधार भेसूर

सराफांच्या दुकानांत

खरेदी चाले सोन्याची

वणवण फिरे गरीब

करण्या विक्री पणत्यांची

नरकासुराच्या बंदीवासातून

न होई सुटका नारीची

अत्याचारित महिलेला

पारखी माया भावाची

कधी येईल ती दिवाळी

 घेऊन समतेचा प्रकाश

सौख्य फुलेल घरोघरी 

होईल अन्यायाचा नाश

21/10/22

धनत्रयोदशी

आज धनत्रयोदशी

पूजा करा रे धनाची

सारे कष्ट धनासाठी

जाणा महत्ता तयाची

कमवाल जितके धन

थोडे त्यातील करा जतन

आज धन रक्षिलेले

उद्या तुमचे करील रक्षण

उपभोग घ्या धनाचा

गरजूंना करा दान

जावयाचे आपल्याला

धन येथेच ठेवून

23/10/22

03/01/2023 आज दादाने दिलेली हिचकॉकची तिसरी डी व्ही डी Rich and Strange पाहिली. कथा थोडक्यात अशी आहे- फ्रेड आणि एमिली हे जेमतेम परिस्थितीत राहणारे जोडपे श्रीमंतीची स्वप्ने पाहत असतात. त्यांना वारसा हक्कापोटी काही पैसे मिळतात. त्यामुळे ते जहाजाने जगप्रवासाला जाण्यास निघतात. वाटेत फ्रेड एका नकली राजकुमारीच्या नादी लागून तिच्यावर पैसे उधळतो. एमिलीचे एका कमांडरबरोबर प्रेमप्रकरण चालू होते. पूर्ण प्रवास झाल्यावर त्यांचे पैसे संपतात. म्हणून ते एका स्वस्तातील जहाजाने परत जायचे ठरवतात. हे जहाज वाटेत फुटते. एका चिनी जहाजातील लोक त्यांना वाचवतात आणि ते जेमतेम घरी येतात. पैशापाठी सुख येतेच असे नाही, याची त्यांना जाणीव होते.

 १  शब्दाने हरीण:-शिकारी हरणाला आकर्षित करण्यासाठी हरणासारखा आवाज काढतो. हरणाला वाटतं की आपल्यापैकी कुणी आहे आणि तो त्या दिशेने जातो आणि शिका-याच्या जाळ्यात फसतो.

२. स्पर्शाने हत्ती:-हत्तीची शिकार करण्यासाठी खड्डा खणून तो आच्छादून त्यावर कोवळे गवत टाकतात. या गवताच्या स्पर्शाने हत्ती फसतो आणि त्यावर पाऊल टाकून खड्ड्यात पडतो आणि शिका-याच्या जाळ्यात फसतो.

३. रसाने मासा:-माश्याला फसवण्यासाठी जे आमिष लावतात, त्यात मृत कीटक किंवा जिवंत कीटक असतो. त्यांपैकी जिवंत कीटकाकडे मासा लवकर आकर्षित होतो. त्याचे कारण जिवंत कीटकाची हालचाल आणि त्याचा गंध.

४. रूपाने पतंग:-पतंग दिव्याकडे आकर्षित होतो, त्याचे एक संभाव्य कारण म्हणजे दिव्यापसून येणारा प्रकाश. या प्रकाशापासून तो आपला मार्ग शोधत असतो.

५. गंधाने भ्रमर:- फुलाच्या रंगामुळे आणि सुगंधामुळे भ्रमर फुलाकडे आकर्षित होतो.

वरील अर्थ पारंपरिक नसून प्रत्यक्ष आहेत. पारंपरिक अर्थांसाठी केवळ संकेत पुरेसे असतात. जसे, चातक आणि चकोर पक्षी काल्पनिक आहेत. हंसाचा नीर-क्षीर-विवेक काल्पनिक आहे.

आकाशाचे ओझे त्यांना नाही कधीच पेलले  

पण आपल्या पाखरांवर कुठले ओझे त्यांनी नाही कधीच टाकले 

स्वतः साठी कुणाकडे नाही काही मागितले  

पण पाखरांच्या चोचीत घास भरविण्यास कितीदा हात पसरले 

फसले कितीदा पण नाही फसवले कुणा 

संकटांच्या वादळात नाही सोडला प्रामाणिकपणा 

उघडले ज्ञानाचे भांडार, दाखवला मार्ग भक्तीचा 

सुगंध दरवळे जीवनात वडिलांच्या स्मृतींचा


वटवृक्षाची आधुनिक कहाणी

आटपाट नगर नव्हतं, आजचं एक स्मार्ट सिटी होतं. अंकिता सकाळी जागी झाली. अंकिता उच्चविद्याविभूषित असली तरी पारंपरिक हिंदू रीतिरिवांजावर श्रद्धा ठेवत होती. आज वटपौर्णिमा होती. पती कामावर गेला होता. अंकिता स्नान करून तयार झाली, पारंपरिक साडी नेसून, पूजेचे साहित्य घेऊन   तिच्या नेहमीच्या मैत्रिणी हसतील म्हणून त्यांना सांगताच वडाच्या पूजेस निघाली. स्मार्ट सिटीच्या खूप बाहेर वडाचं एकच झाड शिल्लक राहिलं होता, तेथे आली. वडाला फेऱ्या घातल्या, वडाची पूजा केला आणि मनोभावे प्रार्थना करू लागली, '' 'मुली' अचानक गंभीर आवाज आला. अंकिता इकडे तिकडे पाहू लागली. 'कोण बोलत आहे?' तिने विचारलं. ' मी. वटवृक्ष,' वटवृक्षाने उत्तर दिलं.' अय्या, म्हणजे मी आजवर गोष्टी वाचल्या, तसे तुम्ही माझ्या उपासनेवर प्रसन्न झाला आहात?' 'होय मुली, काय प्रार्थना आहे तुझी ?'   'हे वटवृक्षा, मला जन्मोजन्मी हाच पती लाभू दे' अंकिता म्हणाली. 'तर माझा वसा ऐकउतू नकोस, मातु नकोस. घेतला वसा टाकू नकोस.' 'उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही.' अंकिता निश्चयाने म्हणाली. 'तर मग ऐक, पतीशी प्रेमाने वाग, पतीला दुसऱ्या पतीची उदाहरणं देऊ नकोस, पतीला मिष्टान्न नको आहे, दोन गोड शब्द हवे आहेत, याने त्याचे आयुष्य वाढेल, तुझे आयुष्यही वाढेल. तुमचा हा जन्म तरी सुखाचा जाईल. सात जन्मांचं कुणी पाहिलं आहे?' 'खरं आहे वटदेवा,' अंकिता मनापासून म्हणाली. 'आणखी,'वटवृक्ष म्हणाला. 'आणखी काय वटदेवा,'अंकितानं विचारलं. ' सध्या मलाच माझ्या जन्माची शाश्वती राहिली नाही. आज वडाची झाडं कुणी लावत नाहीत. वटपौर्णिमा आली की लोकं क्रूरपणे माझ्या फांद्या तोडतात. हे सर्व थाबलं पाहिजे. तू शहाणी आहेस. माझी पूजा करण्यास वनात आलीस. बाजारातून फांदी आणली नाहीस. मला वाचवशील, तर सारी पृथ्वी वाचेल. तरच तुम्हाला सात जन्मांची अपेक्षा ठेवता  येईल.' 'खरं आहे, वटदेवा. तू माझे डोळे उघडलेस. निघते मी आता,' अंकिता वटवृक्षास नमस्कार करून म्हणाली आणि घरी आली. वटवृक्षाचा वसा आयुष्यभर मनोभावे पाळला. वटवृक्ष अंकिताला पावला. तिचा संसार सुखाचा झाला. तसा तुमचा आमचा संसार सुखाचा होवो. ही साठा उत्तरांची कहाणी पाचां उत्तरांत सुफळ संपूर्ण.   

 

शालीमावशीची अधुरी कहाणी:

मला अजूनही शालीमावशी आठवते, दिसायला गोरीपान, ठेंगणी, दात पुढे आलेले (आजीचे दात पुढे होते, त्या वळणावर). ते साल होते १९६५. मी दुसरीमध्ये, म्हणजे सहा वर्षांचा होतो. आमचे सर्व नातेवाईक मुंबईमध्ये होते . शालीमावशी पुण्यात दिल्यामुळे आम्हाला एक सोबत झाली. शालीमावशी वरचेवर आमच्याकडे खडकीला येत असे. आम्हीसुद्धा पुण्याला तिच्या घरी जात असू. शालीमावशीच्या यजमानांना भाऊसाहेब म्हणत, आम्ही मुले त्यांना भाऊकाका म्हणत. तेसुद्धा मला चांगले आठवतात. मला शाळेची वही हवी होती. शालीमावशीने मला 'अरुण'ची वही घेऊन दिली. ती  वहीसुद्धा मला आठवते. अरुणच्या वहीवर उगवत्या सूर्याचे आणि   कोंबड्याचे चित्र असे. आम्ही खडकी स्टेशनवर गेलो. मला भुईमुगाच्या शेंगा घेऊन दिल्या. नंतर बातमी आली की शालीमावशीला के एम हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आहे. आई-अण्णा तिला पाहण्यास जाऊ लागले. मी एकदा आईबरोबर गेलो होतो. शालीमावशीची वाचा गेली होते. आई तिला म्हणाली,' शाले, मी ताई आले आहे.' शालीमावशीला कळले असावे. ती  बोलू शकत नव्हती. नंतर बातमी आली की शालीमावशी गेली. आई शेजारणींना गप्पा मारताना सांगत असे. त्यात असा भाग असे, शालीमावशी गरोदर होती. नवऱ्याने तिच्या पोटावर लाथ मारून तिचा गर्भ मारला होता. सासूने तिला शेंदूर किंवा असाच काहीतरी पदार्थ खायला घातल्यामुळे तिची वाचा गेली होती. हॉस्पिटलमध्ये तिच्या सासरचे ठीक इलाज करत नव्हते. तिच्या नवऱ्याच्या निष्क्रियतेवर हॉस्पिटलच्या प्रमुख बानू कोयाजीसुद्धा चिडल्या होत्या. आमचा धाकटा मामा रमेशमामा फार हळवा होता. शालीमावशी गेल्यानंतर तो भाऊसाहेबांना मारायला चालला होता म्हणे. परंतु बानू कोयाजींनी त्याला आवरले. आई म्हणते, तिच्या अंत्यसंस्काराच्या वेळी रमेशमामा चितेत उडी टाकतो की काय अशी भीती वाटत होती. आजी खूप रडली. म्हणत  होती, ' शाले, तू बाळंतपणाला माझ्याकडे यायचं. मी तुझं केलं असतं.' आई सांगत असे की शालीमावशी लहानपणी खाण्यात फार चोखंदळ होती. चपातीवर करपलेला पापुद्रा काढून टाकत असे. तिला सासरी शिळे पदार्थ खायला मिळू लागले. तिचे सासरचे नाव स्नेहलता होते. सासू एक सारखीस्नेहलता’ नावाने किंचाळत असे. तिची कुसुममावशी बरोबर जोडी होती. त्यामुळे नेहमी शाली-कुसुम असा उल्लेख होत असे. त्यांच्या भरपूर मारामाऱ्या चालत, असे कुसुममावशी सांगे. अण्णा सांगत की तिचा अंत्यसंस्कार झाला त्या दिवशी काळाकुट्ट अंधार आणि कडाक्याची थंडी होती. आई सांगत होती, की तिला एकदा स्वप्न पडले. शाली मावशी स्वप्नात येऊन विचारत होती, ' माझी इच्छा पूर्ण झाली नाही. मी आता कुणाच्या पोटी जन्म घेऊ.' मनातील विचार स्वप्नरूपाने दिसले असतील. जगात सासरच्यांच्या छळामुळे सम्पणाऱयांमधील एक शालीमावशीची अधुरी कहाणी.     

दादा- माझ्या स्मरणात शाली मावशी चांगली आहे. मला ती खूप आवडायची. मी मुंबईत असताना रात्री तिच्या पुढ्यात झोपायचो.   ती खूप टापटीपीची आणि खूप चोखंदळ स्वभावाची होती. अण्णांनी पुण्याचे स्थळ आणले. श्री. प्रधान 512 मध्ये होतेसुधाकर देशपांडे त्यांचा मेव्हणात्याला आई होती पण वडील नव्हतंमला हे (आई वगैरे आणि exact नातेही ) काही नीटस आठवत नाहीपण मी मुंबईत असतानाच शाली आणि कुसूम मावशींचे लग्न ठरलंशाली मावशीला हा मुलगा पसंत नव्हता आणि त्यावरून तिची आजीची भांडणं व्हायचीमला आठवतं एकदा आजीने तिला मारलेही होते. बाईला नवरा चांगला मिळाला नाही की तिचे आयुष्य वैराण होते. शाली मावशीच्या कोणत्या ही व्याख्येत सुधाकर बसत नव्हतात्याला कायम स्वरूपाची नोकरी नव्हती आणि मिळवून टिकवायची ईच्छा ही नव्हती. हे ही चालले असते पण तो बाहेरख्याली होता आणि वेश्यांकडे जायचा. ह्या सगळ्याचा तिला खूप त्रास व्हायचा आणि ती आई कडे येऊन रडायचीअण्णांना असे झालं की मी हे काय करायला गेलो आणि काय झालेमी चौथीत होतो आणि घरी पुण्यात आलो होतोमला मुंबईत असताना दिसणारी आनंदी शाली मावशी कुठेही दिसत नव्हती. आई अण्णा तिला धीर देत पण ती झुरत राहिली. सुधाकर बहिणी कडेच रहात होता, वेगळा राहून संसार करायची त्याला ईच्छा नव्हती. त्यात शाली मावशी गरोदर राहिली, खरेतर तिला तो नवरा, ते घर, ते सासर  काहीच आवडत नव्हतं. मी एकदाच आजी आजोबांबरोबर एक रात्र तिच्या सासरी राहीलो होतो, तो पुण्यातील जुना पण प्रशस्त वाडा होता पण ढेकणांनी भरलेला होता, मी पाच मिनिटं पण झोपू  शकलो  नाही आणि ह्या ठिकाणी शाली मावशी रहाते ह्या विचारानेच मला रडू फुटायचे.

भाऊबीज

 आज दीस भाऊबीज

येईल भाऊ घरी

न्हाऊ माखू घालीन

गोडधोडाची करते तयारी

होतो जेव्हा लहान

भांडभांडलो वेड्यावाणी

आठवणी येती दाटून

डोळां खळे ना पाणी

आज कळे अर्थ

भाऊबहीण नात्याचा

सात जन्मी राहो हाच

बंध रेशमाचा


कालच्या मतदानातील प्रत्यक्ष घडलेला विनोद                 २५/३/२०२३

एक ऑसी कुटुंब मतदानाला आले होते. वडील, मुलगा आणि एक शाळेत जाणारा मुलगा असे तिघे जण होते. मुलगा चांगला चुणचुणीत दिसत होता.  मी मतपत्रिका देत असताना आईचे आणि मुलाचे संभाषण चालू होते. मुलगा शंका विचारत होता आणि आई शंकानिरसन करीत होती. 

मुलगा म्हणाला,'If there is some election  like for premier, I will vote for you, because you are very bossy.'

आम्ही सर्व जण हसू लागलो.

(टीप: ऑस्ट्रेलिया मध्ये राज्याच्या प्रमुखास, म्हणजे आपल्याकडील मुख्यमंत्री, प्रीमिअर म्हणतात. तिथे पंंतप्रधानासही Premier हाच शब्द जास्त प्रचलित आहे.)


मुन्ना वाणी

आम्ही खडकीला मुंबई पुणे रस्त्याला लागून असणा-या गोपीचाळीत राहत होतो. रस्ता ओलांडला की मुन्ना वाण्याचे दुकान होते.


मुन्नाचे वडील पहाटे दुकानाच्या दारात डोक्यावर पाणी ओतून घ्यायचे आणि धोतर नेसून दुकानात बसायचे. त्यांच्या मदतीला त्यांचा मुलगा मुन्ना येत असे. मग रात्री दहापर्यंत दुकान चालू असे.


दिवसभर दुकानामध्ये गि-हाइकांची ये जा चालू असे. एक आण्याची मोहरी, एक आण्याची मिस्री, एक आण्याचा चहा, अशा स्वरूपाची खरेदी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व गि-हाइके करीत असत. मुन्ना आणि मुन्नाचे वडील शांतपणे भराभर छोट्या छोट्या पुड्या बांधत. 'चहा एक आण्याचा येत नाही, दोन आण्याचा घ्यावा लागेल,' असे कधी कधी गि-हाइकाला सांगितले जाई.


त्या काळी पिशवीबंद पदार्थ जवळ जवळ नव्हतेच. मुन्नाकडे सर्व वस्तू मिळत. दुकानात काचेच्या कपाटांत मांडलेल्या वस्तू पाहायला छान वाटे. माझ्या बहिणीला मुन्नाकडे मिळणारे चिल्लाळ ब्रँडचे भरपूर तेल आणि लोणच्याचा मसाला घातलेले लोणचे अजून आठवते.


मुन्ना काही आमच्या वयाचा नव्हता. त्याचे खरे नाव काय होते कुणास ठाऊक. पण आम्ही त्याला 'ए मुन्ना' असेच सरळ म्हणत असू. मुन्नाचा रंग गोरापान, मोठी दंतपंक्ती आणि मुद्रा हसरी होती. मुन्ना हसला की दंतपंक्तीचे दर्शन होई.


आमच्या वडिलांचे मुन्नाच्या वडिलांकडे उधारीचे खाते होते. वडिलांनी मुन्नाच्या वडिलांना सांगून ठेवले होते, की 'माझी मुले आली तर त्यांना काही लागेल ते द्या.' मुन्नाचा एक भाऊ होता, मोहन म्हणून. हा मुन्नासारखा नव्हता, अतिशय उद्धट होता. एकदा त्याने आमची 'दिवसातून किती वेळा लिहून ठेवायचं,' म्हणून माझी आणि माझ्या मोठ्या भावाची बोळवण केली होती. मुन्ना कधी आम्हाला असे काही बोलल्याचे मला आठवत नाही.


पुढे मुले मोठी झाल्यानंतर मुन्नाच्या वडिलांनी मुलांना स्वतंत्र दुकाने थाटून दिली. त्यामुळे मग मुन्नाची भेट झाली नाही.

 

मी नंतर सी ए करू लागलो. आर्टिकलशिप करताना चिंचवडच्या युनायटेड वेस्टर्न बँकेत ऑडिट साठी गेलो असता  मँनेजरच्या कँबिनमध्ये मी मुन्ना बसलेला पाहिला. डोक्याचे पूर्ण टक्कल झाले होते. मी विचारलं, हे कोण? मला सांगितलं, 'हे मुन्नाशेट, या ऑफीसचे मालक.' म्हणजे इथेही मुन्ना हा मुन्नाच होता, फक्त शेट झाला होता. मी मुन्नाला ओळख दिली. मुन्नाने निश्चित मला ओळखलं नाही, पण खूप जुनी ओळख असल्याचं दाखवलं. गप्पा मारल्या. बँकेतील सर्वच लोक त्याच्याशी खेळीमेळीने वागत होते. मुन्ना तसाच होता.


नंतर माझे सी ए पूर्ण झाले . सुरुवातीला मी प्रँक्टिस करीत होतो. मुन्ना तेव्हा मला कुठे भेटला, मला आठवत नाही. पण मुन्ना मला त्याच्या ओळखीच्या दुकानदारांकडे घेऊन गेला.'ये बहुत शरीफ लडका है. इसे अपना काम दो,' म्हणून माझी शिफारस केली.


तेव्हा आम्ही खडकी सोडून चिंचवडला जागा घेतली होती. मी मुन्नाला आमच्या घरी चलण्यास सांगितले. 'तुम्हाला भेटून माझ्या आई-वडिलांना आनंद होईल,' असे सांगितले. मुन्ना आवर्जून घरी आला. वाटेत मला म्हणाला, 'मला असेच एक ग्रुहस्थ भेटले होते. ते म्हणाले, तुम्ही होता म्हणून आमचे वाईट दिवस निघून गेले.' आमच्या बाबतीतही ते ब-याच अंशी खरे होते.


मुन्ना घरी आला. आई-वडिलांशी गप्पा मारल्या. ही माझी मुन्नाशी शेवटची भेट.


काही दिवसांपूर्वी एक लेख माझ्या पाहण्यात आला की 'मोठ्या मॉल्सना टक्कर देऊन छोटे दुकानदार कसे टिकून आहेत.' लेख न वाचताच मला प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. कारण मला मुन्ना वाणी आठवला होता.

दादा:

खूपच सुंदर...हृदयस्पर्शी.. अण्णा ना वाचून खूप छान वाटले असते..मला मुन्नचा मुलगा आठवतो तो पुण्यातील शाळेत होता साधारण आपल्याच वयाचा...त्याला का कुणास ठाऊक आपल्या बद्दल खूप आदर वाटायचा..आणि तो खूप आदराने बोलायचं...कदाचित मुन्ना आणि त्याच्या वडिलांनी सांगितले असावे...


गणपत वाणी


केशवसुत यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणतात. कारण त्या़ंनी इंग्रजी कवितेच्या संपर्कातून मराठी कविता भक्तिकाव्यातून बाहेर काढली. या मराठी कवितेमध्ये पुढे प्रतीकांचा तोच  तो पणा येऊ लागले. मग आले बाळ सीताराम मर्ढेकर. त्यांनी निराळीच प्रतीके वापरून मराठी कवितेला नवी दिशा दिली.


बाळ सीताराम मर्ढेकरांची एक अतिशय लोकप्रिय कविता आहे - गणपत वाणी. या कवितेमध्ये उल्लेख आहे की गणपत वाणी माडी बांधण्याची स्वप्ने पाहता पाहता, माडी न बांधताच निवर्तला. पुढे  कवी नारायण सुर्वे यांनी याच कवितेचा संदर्भ घेऊन त्यांच्या एका कवितेत मर्ढेकरांना उद्देशून म्हटले आहे की, ' तुम्ही आज असता तर तुमच्या गणपत वाण्याने माडी बांधलेली तुम्ही पाहिली असती.' 


गणपत वाण्यावरील ही कविता एस. एस.सी. ला अभ्यासासाठी होती. गणपत  वाण्याचे वर्णन करताना मर्ढेकरांनी   डोळे मिचकावणे, भुवया उडवणे, अशा गणपत वाण्याच्या शारीरिक व्यंगांना लक्ष केले आहे. 


या कवितेचे सर्वसंमत रसग्रहण असे आहे की कवीने गणपत वाण्याच्या रूपात एक कर्तृत्वशून्य आणि निष्क्रिय व्यक्तिरेखेचा उपहास केला आहे.

 वाणी हा तसा निरुपद्रवी प्राणी. या समाजाच्या भावना दुखावल्या आणि ही कविता अभ्याक्रमातून काढून टाकली, असे होत नाही. नाही म्हणायला मला एक प्रसंग आठवतो. एका अंदाजपत्रकाची नानी पालखीवाला यांनी 'वाण्याचे अंदाजपत्रक' अशी संभावना केली होती. त्यावेळी पुण्यातील प्रसिद्ध घाऊक व्यापारी नारायणदास गोविंददास यांनी सकाळ वृत्तपत्रात वाचकपत्र पाठवून नानी पालखीवालांवर टीका केली होती. 


गणपत वाणी कविता गणपत वाण्याच्या मृत्यूने संपते. म्हणजे मर्ढेकरांनी गणपत वाणी हयात असताना ही कविता लिहिली नाही. गणपत वाणी हयात असताना मर्ढेकरांनी ही कविता गणपत वाण्याला दाखवली असती, तर त्याला ती कितपत कळली असती, शंका आहे. कदाचित तो म्हणाला असता,' काय साहेब, मी कुणी मोठा माणूस नाही, तरी पण तुम्ही माझ्यावर कविता लिहिली. बाळू, साहेबांना एक चहा घेऊन ये. बोला साहेब, काय पाहिजे आज? आंबेमोहोर तांदूळ चांगला आला आहे.' 'गि-हाइकाची कदर करणे', हेच त्याला माहीत.

 

स्टीफन लीकॉक या इंग्रजी लेखकाची My Taylor नावाची आपलल्या शिंप्यावर लिहिलेली सुंदर कथा आहे. लेखक आपल्या शिंप्याकडे ठराविक कपडे शिवण्यासाठी जातो. शिंप्याकडे कपडे शिवायला गेल्यावर ठराविक संभाषण होते. 


एक दिवस लेखक या शिंप्याकडे कपडे शिवायला गेला असताना त्याला कळते की हा शिंपी निवर्तला आहे. कुणीतरी त्याला सांगते की ध़ंद्यातील काळजीने तो खचत चालला होता. लेखकाला आश्चर्य वाटते की या शिंप्याला कसली काळजी होती? त्याला तर तो कधी काळजीमध्ये दिसला नाही.  मग लेखकाला जाणवते की त्याने त्याच्या शिंप्याकडे केवळ शिंपी म्हणून पाहिले, कधी माणूस म्हणून पाहिलेच नाही.


'जे न देखे रवी, ते देखे कवी' , अशी कवींची ख्याती असूनसुद्धा बाळ सीताराम मर्ढेकर किंवा नारायण सुर्वेंना गणपत वाण्यामधील माणूस का बरे दिसला नाही?

गणपत वाणी बिडी पिताना

चावायाचा नुसतीच काडी,

म्हणायचा अन मनाशीच की

या जागेवर बांधिन माडी

मिचकावुनि मग उजवा डोळा

आणि उडवुनी डावी भिवयी,

भिरकावुनि ती तशीच द्यायचा

लकेर बेचव जैसा गवयी

गि~हाईकाची कदर राखणे

जिरे, धणे अन धान्यें गळित,

खोबरेल अन तेल तिळीचे

विकून बसणे हिशेब कोळित

स्वप्नांवरती धूर सांडणे

क्वचित बिडीचा वा पणतीचा,

मिणमिण जळत्या आणि लेटणे

वाचित गाथा श्रीतुकयाचा

गोणपटावर विटकररंगी

सतरंजी अन उशास पोते,

आडोशाला वास तुपाचा

असे झोपणे माहित होते

काडे गणपत वाण्याने ज्या

हाडांची ही ऐशी केली,

दुकानातल्या जमीनीस ती

सदैव रुतली आणिक रुतली

काड्या गणपत वाण्याने ज्या

चावुनि चावुनि फेकुन दिधल्या,

दुकानांतल्या जमीनीस त्या

सदैव रुतल्या आणिक रुतल्या

गणपत वाणी बिडी बापडा

पितांपितांना मरून गेला,

एक मागता डोळे दोन

देव देतसे जन्मांधाला!


प. पू. श्रीराऊळ महाराज


ही गोष्ट साधारण १९८५ सालची असेल. आम्ही तेव्हा खडकी सोडून चिंचवडला जागा घेतली होती. मी सी ए पूर्ण केले होतो. आमच्या खडकीच्या जागेत मी माझे सी ए चे ऑफीस थाटले होते. खडकीला बोपोडीला तेव्हा दूध केंद्र होते. (पूर्वी महाराष्ट्र शासनाची दूध केंद्रे असत आणि पहाटे दूध केंद्रावर जाऊन दुधाच्या बाटल्या आणाव्या लागत.) या दूध केंद्रावरील बाई माझ्या ओळखीच्या झाल्या होत्या. मला व्हिजिटिंग कार्डस बनवायची होती आणि या बाईंचा भाऊ व्हिजिटिंग कार्डस बनवत असे म्हणून मी व्हिजिटिंग कार्ड्स बनवण्याचे काम त्याला दिले होते. या बाईंचे नाव मला आठवत नाही, परंतु त्यांच्या भावाचे आडनाव गवांदे होते एवढे मला नक्की आठवते. मी आता सोयीसाठी या बाईंचा सौ. गवांदे आणि  त्यांच्या यजमानांचा श्री. गवांदे असा उल्लेख करतो.


मी माझ्या ऑफीसमधील काम उरकून दुपारी  गवांदेच्या घरी माझ्या कार्डांची चौकशी करण्यास गेलो होतो. बोलता बोलता सौ.गवांदे मला म्हणाल्या की त्यांच्या गुरूंचे, श्रीराऊळ  महाराजांचे, निर्वाण झाले. मला श्रीराऊळ महाराज माहीत नव्हते, त्यामुळे त्यांना अपेक्षित असलेला परिणाम माझ्या चेहऱ्यावर दिसला नाही. त्यामुळे श्री. गवांदे पुढे सांगू लागले.

'माझा श्रीराऊळ महाराजांशी लहानपणापासून संबंध आला होता. मी त्यांचे सहज शे-दीडशे तरी चमत्कार पाहिले आहेत,' 


'एकदा श्रीराऊळ महाराजांनी एका बेकरीच्या काऊंटरवरील बरणी उघडून बरणीतील बटर काढून रस्त्यावरील कुत्र्याला खायला घातले. हे पाहताच बेकरीवाला त्यांच्या पाठी धावत आला आणि तावातावाने भांडत बटर मागू लागला. महाराजांनी एकदा बेकरीवाल्याकडे पाहिले आणि कुत्र्याच्या पाठीवर थाप मारून म्हणाले,'टाक त्याचे बटर.' आणि त्या कुत्र्याच्या तोंडातून खरोखरच बटर बाहेर पडले. ती लाळ होती आणि बटरचा अंश तिच्यात दिसत होता. हे पाहून बेकरीवाला अवाक् झाला आणि चुपचाप निघून गेला.


श्री. गवांदे यांनी सांगितले की लहान असताना ते सकाळी झोपेतून जागे झाले होते, पण अंथरुणातच पडून होते. त्यांनी पाहिले की महाराज काहीतरी करीत होते. श्री. गवांदेंची  बालसुलभ उत्सुकता जागृत झाली. त्यांना असे दिसले की महाराजांनी चक्क एक घड्याळ घेतले आणि फोडून टाकले. त्यांनी सांगितले की ते असेच समोरच्याच्या हातातील घड्याळ मागून घेत आणि त्याच्यासमोरच फोडून टाकत.


श्री. गवांदेंनी सांगितले की श्रीमहाराज कुणाच्या घरी गेले तर देव्हाऱ्यातील देव उचलून बाहेर फेकून देत.


येथून पुढे सौ. गवांदे यांची कथा सुरू होते. सौ. गवांदे यांनी सांगितले की खूप प्रयत्न करून त्यांचे लग्न जमत नव्हते. त्यांना कुणीतरी  श्रीमहाराजांचे नाव सांगून त्यांना विचारण्यास सांगितले. परंतु त्या म्हणाल्या की माझा यावर विश्वास नव्हता. 


एकदा गावामध्ये कुठल्या तरी कारणासाठी गावजेवण होते आणि श्रीमहाराज सुद्धा आले होते. त्याच मनुष्याने सर्वांदेखत श्रीमहाराजांना विचारले की हिचे लग्न कोणाशी होणार ते सांगा. श्रीमहाराजांनी स्वत: उत्तर न देता तेथे एक मुका मनुष्य होता, त्याच्या पाठीवर थाप मारून म्हटले की, 'ते तर हासुद्धा सांगेल. सांग रे, हिचं लग्न कुणाशी होणार?'


त्या वेळी त्या मुक्या मनुष्याने श्री. गवांदे यांच्याकडे बोट दाखवून सांगितले की,' ह्याच्याशी होणार.' सौ. गवांदे म्हणाल्या की मी अवाक् झाले. प्रत्यक्ष श्रीमहाराजांनीच सांगितल्यामुळे सौ. गवांदे यांच्या आई-वडिलांनी श्री. गवांदे यांच्या आईवडिलांशी बोलणी केली. अशा प्रकारे सौ. गवांदे यांचे लग्न श्री. गवांदे यांच्याशी झाले.


सौ. गवांदे यांनी आणखी एक आठवण सांगितली. त्यांच्या ओळखीच्या एक बाई होत्या. त्यांना मूल नव्हते. कुणीतरी त्यांना सांगितले की शेजारी श्रीराऊळ महाराज आले आहेत, त्यांच्याकडे मूल होण्याविषयी सांगावे. या बाई त्या वेळी जेवत होत्या. त्यांनी विचार केला की जेवण  पूर्ण करून निघावे. त्यामुळे जेवण पूर्ण करून हातावर पाणी पडल्या पडल्या त्या श्रीमहाराजांच्या भेटीस निघाल्या. परंतु श्रीमहाराज निघाले सुद्धा होते. या बाई त्यांना शोधत एस टी स्टँडपर्यंत आल्या. परंतु श्रीमहाराज तोपर्यंत बसमध्ये बसलेसुद्धा होते.


 सौ. गवांदे सांगत होत्या की श्रीमहाराजांच्या समाधीच्या वेळी  सुद्धा श्रीमहाराज त्यांना काही ना काही प्रसंगांतून सूचना देत होते, परंतु त्या त्यांना कळल्या नाहीत. उदाहरणार्थ रात्री मुले झोपण्याची तयारी करीत होती. एका मुलाने दुसऱ्याच्या अंगावर खूप पांघरुण टाकले, तेव्हा तो मुलगा म्हणाला, 'मला असं पुरलं का आहे?'. ऐकताना ते विचित्र वाटले, परंतु नंतर श्रीमहाराजांच्या समाधीचे वृत्त आल्यानंतर त्याची संगती लागली.


अशा प्रकारे गवांदे दांपत्याने मला श्रीराऊळ महाराजांविषयी भरभरून सांगितले. मला श्रीमहाराजांचा एक फोटोही मला दिला होता. हा फोटो बरेच दिवस मी ठेवला होता. परंतु नंतर तो हरवला.


श्री राऊळ महाराजांच्या या आठवणी कुठेतरी लिहून ठेवाव्या, असे मला ब-याच दिवसांपासून वाटत होते. परंतु अखेर आज श्रीराऊळ महाराजांच्या कृपेने योग आला आणि मला आठवतील तेवढ्या आठवणी, माझे कुठलेही भाष्य न लिहिता, मी शब्दबद्ध केल्या.

(इंटरनेटवर श्रीराऊळमहाराजांची पिंगुळीला समाधी आहे अशी माहिती मिळते)

|| श्री राऊळ महाराजांस शतश: प्रणाम ||

Message to Shama for her success in classes

शामास, तुझ्या शिकवणीतील मुलांचे यश कौतुकास्पद आहे. खडकीला असताना आपल्या भाजीवालीच्या मुलीपासून तू शिकवणीला सुरुवात केली. शिकवणी करून घरात कपाट घेतले. चांदोबामध्ये आलेल्या कथेप्रमाणे कुठले कौशल्य कधी कामाला येईल ते सांगता येत नाही. तसे ते कौशल्य तुला आज कामाला आले. अतिशय अडचणी असताना, सुखसोयी उपलब्ध नसताना, अतिशय माफक फी घेऊन, कमी वेळामध्ये , मुलांच्या पालकांची मर्जी सांभाळून तू एक फार मोठी यशोगाथा लिहिली आहेस. खरोखर एखाद्या टी व्ही चँनलवर तुझी मुलाखत घ्यायला पाहिजे. असा पराक्रम तू आज नाही, पूर्वीसुद्धा केला आहेस. सर्वच पालकांना ही जाण नसते. मुलगा यशस्वी झाला तर तो हुशार, अपयशी झाला तर 'एवढे पैसे घेऊन बरोबर शिकवलं नाही' म्हणणारे पालकही असतात. व्यावसायिक क्लासेसमध्ये आधी भरमसाट फी घेऊन मोकळे होतात आणि विद्यार्थी यशस्वी होवो न होवो याच्याशी त्यांना कर्तव्य नसते. पण विद्यार्थी यशस्वी झाल्यावर मात्र त्याचे फोटो टाकून स्वतः ची जाहिरात करतात. तूसुद्धा तुझ्या यशाची गाथा कुठेतरी नोंदवून ठेव. मुलांच्या प्रोफाइल्स बनवून ठेव. पुढे पालक जेव्हा शिकवणीच्या शोधात येतील, तेव्हा तुला या प्रोफाइल्स दाखवता येतील. क्लासेसना फक्त मुलांच्या परीक्षेतील यशाशी कर्तव्य असते. पण तू मुलांचं व्यक्तिमत्त्व, आयुष्य घडवतेस. परंतु असंही वाटतं की एकसारखं हेच काम करू नको. भविष्यात बसल्या जागी कसा पैसा मिळवता येईल त्याचा विचार कर. उदाहरणार्थ, यू ट्यूब चँनल वगैरे. If you do not do things differently, you continue to do the same thing. फोनवर एवढं आठवणार नाही, म्हणून सुचेल ते लिहून काढलं. तुझ्या यशास पुन्हा प्रणाम.🙏

16/5/2023

अकरा वेळा भीमरूपी स्तोत्र

ही गोष्ट १९७५-७६ सालची असेल. मी त्या वेळी शिक्षणासाठी घाटकोपरला माझ्या मामाकडे, नानामामाकडे राहण्यास होतो.   


चाळीतील आमच्या घराची कौले फार जुनी झाली होती आणि बदलावयाची होती. परंतु वडिलांच्या पगारात ते काही केल्या जमत नव्हते. मोठ्या भावाला, दादाला नोकरी लागली होती. पावसाळा सुरू होण्याच्या आत घराचे छप्पर बदलणे आवश्यक होते. अँस्बेस्टॉसचे पत्रे फार महाग होते. त्यामुळे मध्यम पर्याय म्हणून अँस्फॉल्टेड पत्रे घालावयाचे ठरले. आमच्या चाळीतच एक सुतार राहत होते, त्यांच्याकडून पत्रे बसवून घेतले. आता पुढील भाग म्हणजे भिंत आणि पत्रे यांच्यामधील फटी बुजवून घेणे. त्यासाठी गवंडी पाहणे आवश्यक होते.


मी मे महिन्याच्या सुट्टीत खडकीला घरी राहावयाला आलो होतो. मे महिन्यामध्ये उष्णता वाढते आणि एखादा तरी वादळी पाऊस होतो.


त्या दिवशी आम्ही सारेजण गाढ झोपेत होतो. मध्यरात्र झाली होती आणि अचानक वादळी पाऊस सुरू झाला. काळाकुट्ट अंधार, विजा कडकडू लागल्या. ढगांचा गडगडाट होऊ लागला. आम्ही सर्व जागे झालो. 


सोसाट्याचा वारा सुटला होता. घराच्या भिंती आणि छप्पर यांमध्ये असणाऱ्या फटीतून वारा आत शिरला आणि नवीन पत्रे एखादा कागद हातात धरून ताणावा त्याप्रमाणे ताणले जाऊ लागले. कुणीतरी छपरावर बसून पत्रे उपटून काढण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आहे, असे वाटू लागले. छप्पर आता कुठल्याही क्षणी निघणार याची खात्री पटली. मध्यरात्री, अशा मुसळधार पावसात छप्पर उडून गेले तर आमची काय अवस्था होईल या कल्पनेने आम्ही अतिशय घाबरून गेलो. असहाय्यपणे आम्ही पत्र्यांकडे पाहत होतो.


माझ्या एकदम काहीतरी मनात आले आणि मी देवासमोर उभा राहून मोठ्याने भीमरूपी स्तोत्र म्हणावयास सुरुवात केली. वा-याचा जोर वाढतच होता. मी स्तोत्र म्हणणे चालूच ठेवले होते. 


थोड्या वेळाने पाऊस ओसरू लागला. वा-याचा जोर कमी होऊ लागला. पाऊस थांबला. माझे भीमरूपी स्तोत्र अकरा वेळा वाचून झाले होते. घरभर पाणी झाले होते. परंतु छप्पर शाबूत राहिले होते.


मी अशाच प्रकारे अकरा वेळा भीमरूपी स्तोत्राचा दोन वेळा प्रयोग केला आहे. परंतु ते प्रसंग एवढे महत्त्वाचे नव्हते.


तुमच्या ऐहिक गरजांसाठी नाही, परंतु जेव्हा तुमचे सर्व उपाय थकले आहेत, कुणीच मदत करू शकत नाही, अशा वेळी आर्त होऊन भीमरूपी स्तोत्र अकरा वेळा म्हटले, तर भक्तवत्सल मारुतिराया निश्चित मदतीला धावून येतो, असा अनुभव मी घेतला आहे. नमस्कार माझा तया मारुतीला.💐


१६/मे/२०२३, सिडनी


दुर्दैवी राजवी


आम्ही खडकीला गोपीचाळीत राहत असताना आमच्या शेजारी एक कन्नड जोडपे राहायला आले.  यजमानांचे पानाचे दुकान होते. हे जोडपे उडुपीचे राहणारे होते आणि स्वत:ला उडुपी म्हणूनच सांगत. यांच्या बायकोचे नाव इंदिरा का इंद्रा होते. मी आणि माझी बहीण शामा तेव्हा खूप लहान होतो. या बाईंना आम्ही इंद्रामावशी म्हणत असू.


आमच्या चाळीत तेव्हा पाण्याचा खूप त्रास होता. अख्ख्या चाळीसाठी पाण्याचा एक नळ होता. पाण्याला खूप बारीक धार असायची.  दु:खाची गोष्ट म्हणजे आम्हाला लोक पाणीच घेऊ द्यायचे नाहीत. घरात कंदील होता. वडिलांना, अण्णांना, बहुतेक तेव्हा ओव्हरटाइम होता, कारण १९६२च्या भारत-चीन युद्धाचे दिवस होते. 


आई कायम पाण्याच्या विवंचनेत असायची. मी आणि शामा आईला सोडत नसे. आई नळावरून पाणी आणायला लागली की आम्ही दोघे कंदिलाच्या उजेडात घरात थांबत नसू. आईच्या पाठी फिरत असू. माझा मोठा भाऊ दादा तेव्हा मुंबईला मामाकडे शिकण्यास होता.


इंद्रा मोठी खमकी बाई होती. चाळीतील भांडखोर बायकांना ती पुरून उरायची. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती माझ्या आईच्या बाजूला होती आणि आईला पाणी मिळवून द्यायची.


 एक प्रसंग मला चांगला आठवतो. रात्रीची वेळ होती. सा-या बायका पाणी भरत होत्या. आईला कोणी पाणी घेऊ देत नव्हते. आई हताश होऊन कमरेवर हात ठेवून बाजूला उभी होती. इंद्रामावशी तरातरा आली आणि हिंदीत म्हणाली,'असं कमरेवर हात ठेवून कुणी पाणी घेऊ देणार आहे का?' नळाला जे भांडं लावलं होतं, ते तिने सरळ काढून टाकलं आणि आईचा हंडा नळाला लावला. इंद्रामावशीला अडवण्याची कुणाची हिंमत झाली नाही.  इंद्रामावशीचा आणखी एक फायदा असा होता की या बायका कन्नडमध्ये जे बोलत ते तिला समजत असे.


इंद्रामावशीला राजवी नावाची एकच मुलगी होती. तिला ती राजू म्हणत असे. राजू खूप रडत असे. एकदा तर राजू जिवाच्या आकांताने रडत होती. राजू बहुतेक वेळ आमच्याच घरी राहत असे. आमच्याच घरी झोपी जाई. इंद्रामावशी मग तिला घेऊन जात असे. 


इंद्रामावशीच्या यजमानांनी नंतर कळसला जागा घेतली. तिथे त्यांनी उपाहारगृह काढले होते. आम्ही कळसला त्यांच्या घरी भेटायला गेलो. इंद्रामावशीचा पाहुणचार घेऊन त्यांचे 'रमा कँफे' नावाचे उपाहारगृह पाहून आम्ही घरी आलो.


नंतर ब-याच  वर्षांनी एका शेजारणीशी बोलत असताना इंद्रामावशीचा विषय निघाला. तेव्हा आईने सांगितले की इंद्राला मुलगी नको होती. एकदा तर तिने मुलगी रडत होती म्हणून   तिच्या अंगावर की डोळ्यात  मिरची टाकली होती. आम्ही कळसला राहायला गेलो तेव्हा तिने तिच्या कपड्यांची पिशवी भरली आणि ती आमच्या आईबरोबर जाण्यास निघाली. आम्ही कसातरी तिचा डोळा चुकवून निघालो.


राजू जिवाच्या आका़ंताने का रडली होती, सतत आमच्या घरी का राहत होती, त्याचा मला तेव्हा उलगडा झाला होता.


सिडनी, २३ मे २०२३

श्रीपादवल्लभांच्या आरतीची गोष्ट 

या आरतीची एक गोष्टच झाली. मी आरती बनवून फक्त तुम्हाला दाखवली होती. आज आम्ही आमचे एक मित्र शिरीश यांच्या घरी गेलो होतो. त्यांच्या मिसेस पडल्या आणि त्यांचा पाय फ्रँक्चर झाला म्हणून त्यांना पाहायचे होते. बरोबर संजय म्हणून दुसरे मित्र आणि त्यांच्या मिसेस होत्या. सुशिल-माधवीसुद्धा आले होते. शिरीशच्या घरासमोर मनोज म्हणून त्यांचे एक मित्र राहतात. ते कार सर्व्हिसिंगचं काम करतात. वर्षानं एकदा तिच्या गाडीचं काम मनोचकडून केलं होतं.

शिरीश म्हणाले की मनोजच्या कडे स्वामी समर्थांची पूजा आहे. म्हटलं जाताना आपण दर्शन घेऊ या. शिरीश, मी,  वर्षा, संजय , माधुरी, सुशिल, माधवी एवढे जण त्यांच्या घरी गेलो. पाहतो तर स्वामी समर्थांची पूजा वगैरे काहीच नाही. देव्हाऱ्यात श्रीपादश्रीवल्लभांचा फोटो होता. भिंतींवर जिकडे तिकडे बहुधा श्रीपादश्रीवल्लभांची वचने लावली होती. त्यांचा श्रीपादश्रीवल्लभांचा कार्यक्रम झाला होता. शिरीशना बहुतेक श्रीपादश्रीवल्लभ माहीत नसल्यामुळे ते स्वामी समर्थ म्हणाले.

मला वाटलं हे श्रीपादश्रीवल्लभांचे एवढे भक्त आहेत तर यांना आरती दाखवण्यास हरकत नाही. मी त्यांना आरतीबद्दल सांगितलं. ते म्हणाले, म्हणून दाखवा, आम्ही ऐकतो. मग मी सर्वांसमोर आरती म्हणून दाखवली. त्यांना आवडली. ते म्हणाले, मला फॉर्वर्ड करा. मी त्यांना आरती फॉर्वर्ड केली.

आमच्या ग्रुप मध्ये एक तेलगू मित्र आहेत. संजय म्हणाले, मी त्यांना फॉर्वर्ड करतो. मी म्हटलं, आरती मराठी आहे, त्यांना कशी समजेल? ते म्हणाले, त्यांना मराठी समजतं. एक ऑडिओसुद्धा द्या, म्हणजे त्यांना चालही कळेल. ते रोज पूजेमध्ये ऑडिओ लावतील. म्हणून ऑडिओ बनवला.

आता योगायोग किती पहा. मी आदल्या दिवशी आरती बनवली होती. आम्ही शिरीशच्या मिसेसना पाहायला गेलो होतो. शिरीशना श्रीपादश्रीवल्लभ माहीत नव्हते. ते स्वामी समर्थ म्हणाले. आम्ही दर्शनाला गेलो स्वामी समर्थांच्या, पण दर्शन दिले श्रीपादश्रीवल्लभांनी आणि आरतीसुद्धा म्हणवून घेतली, त्यांच्या भक्तांना ऐकवली.

सिडनी, २३ जुलै २०२३



चारा भरवुनी चोचीत I बळ देई पंखांत II
पाखरांसाठी आई I कष्टते दिनरात II


आठवणीतील तळेगाव 
आम्ही तळेगावला राहत होतो, तेव्हाच्या या आठवणी आहेत. तळेगावला आम्ही सोमवार पेठेतील जागा सोडून आलो होतो. या जागेला खूप ओल होती. त्यामुळे एक सारखं आजारपण यायचं. तळेगावला येऊन तब्येत सुधारली, असं अण्णा म्हणत. तेव्हाचे म्हणजे १९६१-६२ चे तळेगाव, म्हणजे अगदी खेडेगाव होते‌. माझे वय तेव्हा अवघे दोन-तीन वर्षांचे होते. तरी मला तळेगाव बरेच आठवते. माझ्या आईला आश्चर्य वाटे की मला एवढे कसे आठवते. माझ्या बहिणीचा शामाचा जन्म तळेगावचा, तळेगाव हॉस्पिटलमधील. आम्ही खडकीला राहत असताना, कुठल्या तरी कारणासाठी शामाचे बर्थ सर्टिफिकेट हवे होते. आई-अण्णा तेव्हा तळेगावला जाऊन तळेगाव हॉस्पिटलमधून शामाचे बर्थ सर्टिफिकेट घेऊन , आम्ही राहत होतो त्या चाळीत जाऊन शेजाऱ्यांना भेटून आले होते. शामा तेव्हा दहा-अकरा वर्षांची तरी असेल. गंमत म्हणजे तेव्हा तेथे राहणारे आमचे दणाईत म्हणून एक शेजारी तेव्हाही तेथे राहत होते. माझी मावशी , दीदीमावशी, बाळंतपणासाठी आमच्याकडे तळेगावला होती. त्यामुळे माझ्या मावसभावांचा, सुधीर आणि सुशील (हे जुळे आहेत) यांचा जन्मही तळेगावचा. एकदा आम्ही डेक्कन एक्स्प्रेसने मुंबईहून पुण्याला येत असताना, गाडी तळेगावला थांबली. सुधीर - सुशील स्टेशनवर (प्लॅटफॉर्मच्या पलीकडील बाजूस) रुळावर उतरले आणि माती हातात घेतली. मी विचारले, 'हे काय?' सुशील म्हणाला,' जन्मस्थानच्या मातीला स्पर्श केला.' मला तेथील हरण टेकडी आठवते. एकदा मी आई आणि आईच्या एका मैत्रिणीबरोबर हरण टेकडीवर जायला निघालो. परंतु वर जाळ दिसला. म्हणून आम्ही टेकडी न चढताच परत फिरलो. घरी येईपर्यंत पूर्ण टेकडीला वणवा लागला होता. हा वणवासुद्धा मला आठवतो. तळेगावमध्ये पंच पांडवांचे देऊळ आहे. आम्ही एकदा रात्रीच्या वेळी या देवळात गेलो होतो. तेथे मोठ्या मिशा असलेला, मोठ्या डोळ्यांचा भीम पाहून आम्ही घाबरून गेलो. या देवळात द्रौपदीची एका कुशीवर झोपलेल्या अवस्थेतील मूर्ती होती. ही मूर्ती म्हणे दर सहा महिन्यांनी कूस बदलत असे. ते ऐकून आम्ही आणखीच घाबरलो. आमचं तळेगावातील घर दोन खोल्यांचं होतं. दिवाणखान्याच्या खोलीचा निळा रंग मला आठवतो. घरासमोर पडवी होती. आमची कोपऱ्याची खोली होती. त्यामुळे लागूनच बसण्यासाठी दगडी कट्टा होता. घरातून बाहेर पडलं की मोठा रस्ता होता आणि या रस्त्यावर सतत रहदारी असे. रस्त्यापलीकडे गिरणी होती. मी एकदा एका छोट्या डब्यात खडे घालून दळण आणण्यासाठी गिरणीत गेलो होतो.

आमच्या घरी एक मजबूत लाकडी स्टूल होतं. आईचं नॉव्हेलचं कपडे शिकायचं मशीन होतं. हे सारं तळेगावच्या घरी आणलं होतं. नॉर्टनची एक हिरव्या रंगाची सायकल होती. ही सायकल पुढे चोरीला गेली‌ रंगपंचमीच्या दिवशी एका औषधाच्या काचेच्या बाटलीच्या झाकणाला भोक पाडून आईने मला त्यात रंगीत पाणी भरून दिलं होतं. तेथील मुलांबरोबर मी रंगपंचमी खेळल्याचं मला आठवतं. तेथे भूषण नावाचा माझ्यापेक्षा मोठा मुलगा होता, तोसुद्धा मला आठवतो. एकदा दिवाळीमध्ये मला एक फुसका फटाका मिळाला. तो मी पणतीवर धरला. दादा खिडकीतून पाहत होता. हा फटाका चांगला होता. तो एकदम फुटला. सगळी घरं ओलांडून गेल्यावर दुसऱ्या टोकाला मागच्या बाजूस एक वाणी होता. त्याच्याकडून मी श्रीखंडाच्या वड्या आणलेल्या मला आठवतात. असो. या झाल्या माझ्या आठवणी. तळेगावला पाण्याचा त्रास होता. कावडवाला पाणी आणून द्यायचा. संडास खूप लांब होतं आणि संडासला जाण्यासाठी शेताडी तुडवीत जायला लागायचं. त्यामुळे रात्री संडासला जाणं त्रासदायक होतं. आम्हा लहान मुलांची सोय रस्त्याच्या कडेला होत असल्याने मी संडासपर्यंत गेलो नाही. अण्णांचं ऑफीसला जाणं खूप त्रासदायक होतं. तेव्हा गाड्याही खूप कमी होत्या. एकदा तर ते रात्री दोन वाजताच स्टेशनवर गेले आणि गाडीची चौकशी करू लागले. स्टेशनमास्तर म्हणाला, 'अजून रात्र आहे. आता झोपा स्टेशनवरच.' एकदा आमचे आजोबा (आईचे वडील) राहायला आले. अण्णांचे हाल बघून ते म्हणाले, ' तुम्ही सगळे महालात राहता‌. ते तिकडे हाल काढतात. ऑफीस जवळ जागा पहा.' पुढे १९६२ मध्ये भारत चीन युद्ध सुरू झालं. अण्णांना ओव्हरटाइम सुरू झाला. त्यामुळे खडकीला जायचं ठरलं. अण्णांचा नायडू नावाचा एक मित्र होता, त्याच्या गोपीचाळीतील जागेत पोट भाडेकरू म्हणून. निघताना दणाईत अण्णांना सांगत होते,' जागा सोडून पस्तावाल.' पुढे गोपीचाळीतील पाण्यावरून भांडणं, शेजाऱ्यांच्या त्रास बघून अण्णा वारंवार म्हणत 'तळेगाव सोडून पस्तावलो.' पुढे मी सी ए करीत असताना मला तळेगावचे एक गृहस्थ भेटले. मी त्यांना आम्ही पूर्वी तळेगावात राहत होतो, म्हणून सांगितलं. ते म्हणाले,' तुम्ही चांगला निर्णय घेतला. ऑफीसपासून इतक्या दूर राहण्यात काही अर्थ नाही.' नंतर आणखी एक मित्र भेटला. तो तळेगावात राहत होता. मी त्याला तळेगावच्या आठवणी सांगितल्या. तो म्हणाला, 'तसं काही आता राहिलं नाही. खूप रहदारी झाली आहे.' मी आजतागायत तळेगावला गेलो नाही. त्यामुळे माझ्या आठवणीत तेच तळेगाव आहे, जे ६०-६२ मध्ये होतं.


सिडनी , २ मार्च २०२४


खडकी-लष्करी महत्त्वाचे परंतु दुर्लक्षित गाव -१

पुण्याजवळ असणाऱ्या खडकी गावाबद्दल मला काही सांगायला सांगितलं, तर मी त्याचं वर्णन 'लष्करी महत्त्वाचे परंतु दुर्लक्षित गाव' असंच करीन. अण्णांच्या ५१२ वर्कशॉपमधील नोकरीमुळे आम्ही १९६२ ते १९८४ अशी तब्बल २२ वर्षं खडकीत राहिलो. आमचा खडकीच्या ज्या भागांशी संपर्क आला, त्यांची इथे थोडक्यात माहिती आणि माझ्या आठवणी देतो आहे.


खडकी कॅन्टोन्मेंट:- दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांबरोबर १८०२ मध्ये तैनाती फौजेचा तह करून आपल्या स्वातंत्र्यास तिलांजली दिली होती , तरी त्याचे बापू गोखलेसारखे शूर सेनापती हार मानायला तयार नव्हते. त्यामुळे जी काही अखेरची इंग्रज-मराठा युद्धे लढली गेली, त्यांतील एक लढाई १८१७ मध्ये खडकी येथे लढली गेली. या लढाईत इंग्रजांच्या तीन हजार सैन्यापुढे मराठ्यांच्या अठ्ठावीस हजार सैन्याचा पराभव झाला. या युद्धानंतर खडकीत ज्या भागात इंग्रजांच्या छावण्या होत्या, तो भाग खडकी कॅन्टोन्मेंट झाला. हा खडकीचा मोठा भाग आहे. या भागाच्या निवडणुकाही वेगळ्या होतात.

एल्फिन्स्टन रोड:-खडकीच्या लढाईतील इंग्रजांच्या विजयाचा शिल्पकार माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन याच्या नावे खडकीत एल्फिन्स्टन रोड हा महत्त्वाचा रस्ता होता. याच रस्त्याला किर्लोस्कर ऑइल इंजिन्स कंपनी होती. या रस्त्याचे नाव पुढे लक्ष्मणराव किर्लोस्कर पथ करण्यात आले. एल्फिन्स्टन रोड सीमेंट कॉंक्रीटचा होता. त्यावरून कधी रणगाडे गेल्याच्या खुणा होत्या. आमची आलेगावकर शाळा एल्फिन्स्टन रोडलाच होती. या एल्फिन्स्टन रोडला बरेच जुने बंगले होते. यातील एक बंगला भूत बंगला आहे अशी शाळेत चर्चा होत असे. शाळेच्या पुढे गेले की खडकी बाजार लागतो. एल्फिन्स्टन रोड पुढे पुणे स्टेशनला जातो.

आर्मी बेस:- ब्रिटिश काळापासून खडकी हा आर्मीचा बेस होता,  तो स्वातंत्र्यानंतरही राहिला. येथे ॲम्युनिशन फॅक्टरी, ऑर्डिनन्स फॅक्टरी, आर्सेनल, एच ई (हाय एक्स्प्लोझिव्ह ) फॅक्टरी, ५१२ आर्मी बेस वर्कशॉप अशी लष्कराशी संबंधित बरीच संस्थापने होती. 

खडकी स्टेशन ते खडकी बाजार (या रस्त्यास महात्मा गांधी रोड हे नाव होतं) जाताना उजव्या बाजूस नादुरुस्त रणगाड्यांचे मोठे गोदाम होते. येथे पहारा करणारे लष्करी जवान दिसत. एक टेहळणी केंद्रही होते. 

आम्हाला भूगोलाच्या पुस्तकात भौगोलिक ठिकाणांच्या प्रसिद्धीमध्ये 'खडकी-दारूगोळ्याचा कारखाना' असे होते. आम्हाला खोपकर नावाचे सर होते. ते म्हणत, 'भारत पाकिस्तान युद्ध झालं तर खडकी हे पाकिस्तानी विमानांचं लक्ष्य असेल.' आम्ही खडकीत असतानाच १९६५ आणि १९७१ ची भारत-पाकिस्तान युद्धे झाली. पण सुदैवाने म्हणा की आपल्या लष्कराच्या जागरुकतेमुळे म्हणा, तसा प्रसंग ओढवला नाही. पण एच ई फॅक्टरीतील अपघाती स्फोट मात्र माझ्या लक्षात आहे.

एच ई फॅक्टरीतील स्फोट:-  मी या घटनेविषयी निरनिराळ्या ब्राऊझरमध्ये सर्च केलं, परंतु या घटनेविषयी माहिती मिळाली नाही. ही १९७० सालची घटना आहे. कारण मी तेव्हा सातवीत होतो. संध्याकाळची वेळ होती. मी आणि दादा शाळेतून घरी पोहचत होतो. त्या वेळी एक प्रचंड मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज झाला. आम्ही मागे वळून पाहिलं तर आकाशात तांबट रंगाचा ज्वालामुखीतून बाहेर पडतो तसा फवारा निघून आकाशात ढग तयार झाला होता. तो बिलकुल हलत नव्हता. आम्ही लवकर घरी आलो. 

दुसऱ्या दिवशी सकाळमध्ये मुख्य मथळा होता,'खडकीच्या एच ई फॅक्टरी मध्ये भीषण स्फोट' आणि आम्ही आदल्या दिवशी पाहिलेल्या ढगाचा फोटो होता. तेव्हा पेपर एवढा तपशीलवार वाचत नव्हतो. पण तेथील फॅक्टरीतील गनपावडरच्या डब्यांचा स्फोट झाला होता. तोही संध्याकाळी. 

अण्णा असं म्हणाले की ते कामगार जे काम करीत होते, त्यामध्ये ते गॅस सिलिंडर्स वापरत होते. हे सिलिंडर्स थंड होण्यास वेळ द्यावा लागतो. पण घरी जाण्याच्या घाईमुळे हा वेळ दिला नाही. त्यामुळे सिलिंडर्सचा स्फोट झाला आणि त्यातून गनपावडरचा स्फोट झाला. या स्फोटातील कामगार वाचणं शक्यच नव्हतं. किती मनुष्यहानी झाली माहीत नाही.खडकी गावात विशेषतः पोलीस लाइनमधील घरांचं खूप नुकसान झालं.

माझ्या वर्गात साठे नावाचा मुलगा पोलीस लाइनीत राहणारा होता. नंतर  आम्हाला शाळेकडून सांगण्यात आलं की दुसऱ्या दिवशी घरून चपाती पेपरमध्ये बांधून घेऊन या. यांतून या अफेक्टेड मुलांना काही दिवस शाळेत जेवायला घालण्यात आलं.

सिडनी , २७/३/२०२४

खडकी-लष्करी महत्त्वाचे परंतु दुर्लक्षित गाव -२

खडकी स्टेशन:-पुणे स्टेशनहून गाडीने मुंबई कडे निघाल्यावर शिवाजीनगर स्टेशन गेले की खडकी. खडकी स्टेशनला बहुतेक सर्व गाड्या जाताना येताना थांबत. (फार पूर्वी डेक्कन क्वीनसुद्धा थांबत असे.) आमचे घर खडकी स्टेशनपासून चालत पाच मिनिटांच्या अंतरावर होते. त्यामुळे मुंबईला जाताना फार उपयोग होई. पुणे महानगरपालिकेची शहरी बससेवा पी एम टी भरवश्याची नसल्याने पुण्याला जाताना सुद्धा लोकल ट्रेनचा उपयोग होई.

खडकी स्टेशनसमोर जयहिंद चित्रपटगृह होते, जेथे चित्रपट पाहत आम्ही लहानाचे मोठे झालो. जवळच स्टार ऑफ इंडिया नावाचे इराण्याचे हॉटेल होते. 

खडकी स्टेशनपलिकडे गेल्यावर  रेंज हिल्स आणि औंध गाव या ठिकाणी जाता येई. या भागाशी आमचा फारसा संबंध आला नाही. 

खडकी स्टेशन पलीकडे गेल्यावर पुणे विद्यापीठ परिसरही लागत असे. (आता याचे नाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ झाले आहे). पुणे विद्यापीठास फारच मोठा आणि निसर्गरम्य परिसर लाभला आहे. पुणे विद्यापीठात माझे कंपनी सेक्रेटरीच्या परीक्षेचे केंद्र असे.

बोपोडी नाका: दापोडीच्या दिशेने गेल्यावर बोपोडी लागते. येथे पूर्वी फार मोठा जकात नाका होता. त्यामुळे येथे ट्रक्सची फार मोठी लाईन लागत असे. बोपोडी नाक्यावर दूध सेंटर,  मटण मार्केट आणि भाजी मंडई होती. रेल्वे लाइन ओलांडून गेल्यावर बोपोडी गाव होते.  बोपोडी गावात नाईक चाळ होती. या चाळीचा गणपतीचा देखावा दर वर्षी बक्षीस घेऊन जाई. त्यामुळे नाईक चाळीचा गणपती पाहण्यापुरते आम्ही बोपोडी गावात जात असू. बोपोडी गावातच बोपोडी वॉर्डाचे नगरसेवक श्री. चंद्रकांत छाजेड राहत असत. हे कॉंग्रेस आय पक्षाचे होते. आमच्या आलेगावकर शाळेच्या शिक्षण समितीवरही होते. यांच्याविषयी माझा व्यक्तिशः चांगला अनुभव आहे. माझ्या सासूबाईंचा सुद्धा यांच्याविषयी चांगला अनुभव आहे.

खडकी गाव किंवा खडकी बाजार:- लक्ष्मणराव किर्लोस्कर पथाने आमच्या शाळेच्या पुढे गेल्यावर खडकी बाजारचा पी एम टी चा मोठा बस स्टॅंड होता. गावामध्ये सर्व प्रकारची दुकाने होती. आमच्या शाळेत दुकानदारांची मुलं बरीच होती. खडकी गावात आई-अण्णांबरोबर फिरायला आल्यावर हे मित्र दुकानातून हात करायचे. सात आणि दहा तारखेला खडकी गाव फिरण्यास योग्य नव्हता. कारण सात तारखेला ५१२ चा तर दहा तारखेला फॅक्टरीचा पगार होत असे. त्यामुळे मदिराभक्तांस रान मोकळे असे.

खडकी गावात भाजी मार्केट, मटण, चिकनची दुकाने होती. येथे भाजी स्वस्त मिळते म्हणून दादा अजूनही खडकी गावात जातो आणि येथील डेव्हलपमेंट्सची मला माहिती देतो्.

खडकी गावात एक्सेलसिअर हे चित्रपटगृह होतं. येथेसुद्धा आम्ही पुष्कळ चित्रपट पाहिले.  मॉडर्न कॅफे या उडपी रेस्तरॉंमध्ये राइस प्लेट, मसाला डोसा अशा पदार्थांचा आस्वाद घेण्यास भेट होई. सुदर्शन म्हणून एक छोटे हॉटेल होते, तेथे आम्ही फक्त गुलाबजाम खाण्यास जात असू.

खडकी गावात दादा आणि मी ज्ञानज्योती म्हणून वाचनालयात जात असू. पुढे ते वाचनालय बंद करून राजश्री म्हणून वाचनालयात जात असू. तेथून आणखी थोडे पुढे गेल्यावर एक सुंदर राममंदिर होते. आणखी पुढे गेल्यावर गाव संपून मुळा नदी शांतपणे वाहताना दिसे. नदीच्या काठी एक शिवमंदिर होते. नंतर त्या मंदिराच्या बाजूला साईबाबांचे मंदिर झाले. या साईबाबा मंदिरात आम्ही नियमित जात असू.

या बाबांच्या मंदिरातील माझा अनुभव सांगण्यासारखा आहे. मी सी ए एन्ट्रन्सची परीक्षा पास झालो होतो. तेव्हा बाबांच्या मंदिरात पेढे घेऊन गेलो. पुजाऱ्याकडे पेढे देऊन सांगितलं की ही फार अवघड परीक्षा असते. पुजारी एकदम सहजपणे म्हणाला, 'ते होणार , कारण ते बाबांच्या मनात आहे.' तेव्हा ही गोष्ट अशक्य कोटीतील वाटत होती, पण बाबांच्या कृपेने आज शक्य झाली आहे.

खडकी-लष्करी महत्त्वाचे परंतु दुर्लक्षित गाव -३

आलेगावकर शाळा:-खडकीमध्ये ही आमची शाळा होती. येथे प्राथमिक आणि माध्यमिक (११वी पर्यंत) अशा शाळा होत्या. प्राथमिक शाळा मुलामुलींसाठी एकत्र होती. माध्यमिक शाळा मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगळ्या होत्या. मुलींच्या शाळेचे नाव गुलुबाई मुलुक इराणी कन्या शाळा होते. (या बाईंनी शाळेला देणगी दिली होती. त्यामुळे त्यांचे नाव शाळेला दिले होते.) शाळेची स्थापना आलेगावकर बंधूंनी केली होती. त्यामुळे शाळेचा स्थापना दिवस (मला वाटतं २३ जुलै) शाळेत साजरा केला जात असे आणि आलेगावकर बंधूंच्या कार्याविषयी माहिती दिली जात असे. आता येथे टिकाराम जगन्नाथ म्हणून कॉलेजही झाले आहे.

खडकीमध्ये इंग्रजी माध्यमासाठी सेंट जोसेफ म्हणून कॉन्व्हेन्ट शाळा होती. आमचे काही मित्र या शाळेत होते.

किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड:- खडकी मध्ये किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड ही लक्ष्मणराव किर्लोस्कर पथावर तर खडकी स्टेशनच्या पलीकडे स्वस्तिक रबर ही कंपनी होती.

स्वस्तिकच्या चपला फार प्रसिध्द होत्या. एके काळी बाटापेक्षा लोक ही चप्पल मागून घ्यायचे. पण पुढे ही कंपनी बंद झाली.

किर्लोस्कर ऑइल इंजिन्स ही कंपनी आमच्या शाळेच्या रस्त्यावर होती. पुढे चालत रेल्वे लाइन लागायची. या रेल्वे लाइनपर्यंत ही कंपनी पसरली होती. पुढे मला कंपनी सेक्रेटरी घ्या ट्रेनिंगसाठी जेव्हा कंपनी निवडावयाची होती, त्या वेळी मी या कंपनीची निवड केली. वास्तविक या वेळी आम्ही चिंचवडगावात राहायला गेलो होतो. त्यामुळे ट्रेनिंगसाठी खडकीला येणे सोयीस्कर नव्हते. परंतु शाळेत जात असल्यापासून जी कंपनी बाहेरून पाहत होतो, ती कंपनी कशी आहे ही पाहण्याची उत्सुकता होती.

कंपनीमध्ये शिरकाव केल्यावर ती बाहेरून जशी प्रशस्त वाटत होती, तशीच आतूनही होती. पण कंपनीतील लोकांचं म्हणणं होतं की नुसता पोकळ वासा आहे. बिझिनेस संपला आहे आणि एवढे लोक पोसणं कंपनीला शक्य होत नाही. 

माझं ट्रेनिंग संपत होतं त्याच दिवशी कंपनीचं वार्षिक उत्पादन लक्ष्य पूर्ण झाल्यामुळे समारंभासस आलेले शंतनुराव किर्लोस्कर आणि चंद्रकांत किर्लोस्कर पाहावयास मिळाले. चंद्रकांत किर्लोस्करांच्या पत्नी सुमनताई किर्लोस्कर यांच्या हस्ते गुणवंत कर्मचाऱ्यांना बक्षिसे देण्यात आली.

जयहिंद चित्रपटगृह: जयहिंद चित्रपटगृहाचा उल्लेख केल्याशिवाय खडकीतील वास्तव्याचे वर्णन पूर्ण होणार नाही. खडकी स्टेशनच्यासमोर या चित्रपटगृहांची  साधी परंतु भव्य इमारत डोळ्यांत भरत असे. चित्रपटगृहातील खुर्च्या लाकडी असल्या तरी बाल्कनी, बॉक्स या सोयी होत्या‌. 

संध्याकाळी सहाच्या खेळाला मी आणि दादा चार वाजता नंबर लावून बसत असू. गुलाबी पातळ कागदाच्या तिकीटांवर पेनने खुर्चीचे नंबर टाकून तिकीटे मिळाली की जग जिंकल्याचा आनंद होत असे. पाहिलेल्या चित्रपटांत पॅनिक इन बगदाद, बगदादका चोर असे अगाध चित्रपट असत. आजच्या मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात उजेड असतो. त्यामुळे चित्रपटाची मजा येत नाही. त्या वेळी दिवे गेले की बाजूला कोण बसलं आहे तेसुद्धा दिसत नसे. पडद्यावरील चित्रांना बांध लो उसे, मारो उस को, बघ रे तुझा बाप आला, असे इशारे देत चित्रपटाशी समरस होणारे प्रेक्षकही आता गेले.  

जयहिंद चित्रपटगृहाविषयी किती लिहिलं तरी ते कमीच पडेल. आता चित्रपटगृह पाडायला घेतलं आहे आणि अखेरच्या घटका मोजतं आहे. पण हे चित्रपटगृह कधीही स्मरणातून जाणार नाही.

खडकीने आम्हाला काय दिलं?- आता शेवटी या प्रश्नाचं उत्तर शोधायला गेलं तर काय सांगता येईल ? खडकी म्हणजे एक मिश्र वस्तीचे बकाल गाव. देशी दारूची दुकाने जागोजागी. सकाळ झाली की खडकी स्टेशनवरून सदरा, पायजमा , गांधी टोपी घातलेले कामगार गावात जाताना दिसत. तेच संध्याकाळी परत जाताना दिसत. खरं तर हे राहण्यायोग्य गावच नव्हतं. गोपीचाळीत आम्ही राहायला आलो ते 'इथे कुठे कायमचं राहायचं आहे' हा विचार करून. आणि त्याच दहा बाय दहाच्या जागेत आयुष्यातील महत्त्वाची बावीस वर्षे गेली. मग पावसात गळणारी कौले, घरात शिरणारे पाणी, खुडबुड करणारे उंदीर, गलिच्छ संडास हे दैनंदिन जीवन झालं.

पण मुलांसाठी जेथे आईवडील तेच तीर्थक्षेत्र असतं. चाळीतील मुलांशी आम्ही फारसे मिक्स अप झालो नाही. कारण एकदाच चाळीतील मुलांशी भांडण झाल्यावर आईने दाराला कडी घालून आम्हाला घरात बसवलं. मग तिथेच आम्ही खेळलो. कुमार, चांदोबा, इंद्रजाल कॉमिक्सची पारायणे केली. अशा जागेत किळस न करता आमचे मामा-मावश्या, आजी-आजोबा येऊन राहिले.

खडकीतील दुसरे तीर्थक्षेत्र म्हणजे आमची आलेगावकर शाळा. ही शाळा तशी लहान होती. पण या शाळेमुळे आम्हाला सारे मानसन्मान मिळाले. पुण्यातील मोठ्या शाळांत आम्हाला स्पर्धांसाठी नेलं. तेथील शिक्षकांनी अमोल ज्ञान दिलं.

लहानपणीचा काळ सर्वांत महत्त्वाचा असतो. त्यामुळे यापुढे कितीही घरांत राहिलो तरी आमच्या स्वप्नात कायम खडकीचे घरच येते. 







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आमचे अण्णा - एक भावपूर्ण स्मरण

 आमचे अण्णा - एक भावपूर्ण स्मरण कै. पंढरीनाथ दत्तात्रेय जुन्नरकर  (१७/१०/१९२२-१/२/२०१४) माझे वडील कै. पंढरीनाथ दत्तात्रेय जुन्नरकर एक अत्यंत...